मुंबई : शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची प्राथमिकता असून महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधानभवनात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
सर्व देश, राज्य लॉकडाऊनमध्ये होते तरी शेतकरी बांधव मात्र कर्तव्यावर होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश कार्यालयीन कामे घरुनच केली जात होती. शेतकऱ्यांनी लॉकडाऊन केले असते तर कठीण परिस्थिती निर्माण झाली असती. इतरांसाठी मळे फुलवणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काटे येऊ नयेत यासाठी त्यांच्या आणि त्यांच्या कटुंबियांच्या मागे सरकार ठामपणे उभे राहील, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली.
वीजबिलांची थकबाकी भरुन योजनेचा लाभ घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार
वीजग्राहकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करण्यासाठी शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. वीजबिल थकलेल्या सर्व शेतकऱ्यांनी थकित वीजबिलांवर सूट मिळवण्यासाठी नवीन कृषी वीज जोडणी धोरणाअंतर्गत जाहीर केलेल्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही पवार यांनी यावेळी केले. तसेच शेतकरी, घरगुती वीज ग्राहक आदी सर्वांनाच व्यवस्थित वीज मिळाली पाहिजे यासाठी सर्वांनी वीजबिले भरणे आवश्यक आहे. वीजगळती होणार नाही याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असेही पवार म्हणाले.
शेतकऱ्यांचे प्रश्न, कृषिपंपांचे महत्त्व आम्हाला माहीत आहे. सर्वांना व्यवस्थित वीज मिळेल. वेळेत वीजेची जोडणी मिळेल हे आमचे उद्दिष्ट आहे. 5 वर्षात 5 लाख सौर कृषिपंप देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या अनुषंगाने सौर कृषिपंप योजनेला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे.
पडीक जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारुन प्रति एकरी दरवर्षी 30 हजार रुपये भाडे आणि त्यावर दरवर्षी 3 टक्के वाढ असा फायदा मिळवण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. त्याचा लाभ घ्यावा, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
नवीन कृषिपंप वीज जोडणी धोरणांतर्गत 19 फेब्रुवारीपर्यंत 10 हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचे उद्दिष्टापेक्षा अधिक काम करत सुमारे 18 हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे. तसेच 10 हजाराहून अधिक सौर कृषिपंप देण्यात आले आहेत. 84 वाहिन्यांना लघु सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज पुरवली जात असून त्याद्वारे 30 हजाराहून अधिक शेतीपंपांना दिवसा वीज पुरवठा केला जात आहे, असे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी सांगितले.
थकबाकी पूर्ण भरणाऱ्या शेतकऱ्याचा सन्मान…
वीजेची संपूर्ण थकबाकी भरुन थकबाकीमुक्त झालेले इगतपुरीचे शेतकरी कचरु धोंडू बोराडे यांना सन्मानपत्र, पालीचे शेतकरी रोशन रुईकर यांना सौर कृषिपंप हस्तांतरण पत्राचे वितरण तर पालघरचे संजय पावडे यांना नवीन कृषिपंप वीजजोडणी प्रमाणपत्र यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्याचे आले. तसेच कृषी ऊर्जा पर्व पोस्टर आणि माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शेतकरी कचरु बोराडे यांनी थकबाकीची 91 हजार 500 रुपये इतकी रक्कम एकरकमी भरल्यामुळे या योजनेंतर्गत त्यांना सुमारे 1 लाख 25 हजार रुपयांची सूट मिळाली, अशी माहिती यावेळी देण्यात आली.