कोल्हापूर – शाहूवाडी तालुक्यातील जनतेला पिण्याचं शुध्द आणि पुरेसं पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी जुन्या, कार्यरत तसेच नवीन पाणी पुरवठा योजनांना गती देण्यात येईल, असे प्रतिपादन कृषि व पाणी पुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
शाहूवाडी तालुक्यातील पाणी पुरवठा, कृषि, महसूल, सामजिक वनीकरण, आरोग्य तसेच अन्य विभागाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी शाहुवाडी येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत राज्यमंत्री सदाभाऊ खोत बोलत होते. बैठकीस मान्यवर पदाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सदाभाऊ खोत म्हणाले की, पाणी पुरवठा योजनांवर शासन फार मोठा खर्च करीत असून या योजनाव्दारे जनतेला पूर्ण क्षमतेनं पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठी शासनस्तरावरुन आवश्यकती मदत केली जाईल. पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यात हेतुपुरस्कर टाळाटाळ आणि हायगय करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा, असे निर्देश देऊन राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले की, यापुढील काळात कंत्राटदारांनी एक काम पूर्ण केल्याशिवाय दुसरे वा अन्य काम त्यांना देऊ नये, याकामी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक दक्ष रहावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
आरोग्य तपासणीसाठी कॅम्प लावावे. सामाजिक वनीकरण विभागाने झाडे लावण्यासाठी 2 लाखाचे उद्दिष्ट दिले असून चालू वर्षी गायरान / रस्त्याच्या कडेला झाडे लावावीत. कृषि यांत्रिकीकरणासाठी आवश्यक निधी तात्काळ देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
कृषि विभागामार्फत शेती आणि शेतकरी विकासाच्या अनेकविध योजना आणि उपक्रम शासन राबवित असून या योजना गावपातळीवर प्रभावीपणे पोहोचाव्यात. शेती विकासाच्या योजना गावापर्यंत, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवा, असे आवाहनही त्यांनी कृषि सहाय्यकांना केले.