नवी दिल्ली -समाजवादी पार्टीबरोबर कॉंग्रेसचे वैचारिक मतभेद आहेत. मात्र भाजपची राजवट अतिशय भयानक असल्यामुळे भाजपला सत्तेतून हटवणे हे कॉंग्रेससाठी प्राधान्य आहे, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते.
सपाबरोबर कॉंग्रेसचे समीकरण फार चांगले आहे, असे नाही. त्या पक्षाबरोबर कॉंग्रेसचे खूप खोलवरचे मतभेद आहेत. मात्र भाजपला सत्तेतून हटवणे हेच कॉंग्रेसचे प्राधनान्य आहे, असे खुर्शिद म्हणाले. उत्तर प्रदेशात चौथ्या टप्प्याचे मतदान सुरू असतानाच खुर्शिद यांनी हे वक्तव्य केले असल्यामुळे जर उत्तर प्रदेशात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली तर निवडणुकीनंतर सपाबरोबर आघाडी करण्याचा कॉंग्रेसचा मनोदय असल्याचे मानले जाऊ लागले आहे.
कॉंग्रेस उत्तर प्रदेशात आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी निवडणूक लढवत आहे. मात्र या निवडणुकीत कॉंग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या प्रियंका गांधी यांनी आखलेल्या रणनितीला किती यश मिळते, हे पाहावे लागेल. आज नाही तर उद्या उत्तर प्रदेशचे राजकारण नक्की बदलणार आहे, असेही खुर्शिद म्हणाले.
आतापर्यंत झालेल्या मतदानानंतर भाजपा आणि सपा या दोन्ही पक्षांनी निवडणुकीत विजय मिळण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. आतापर्यंत समाजवादी पार्टीने कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मात्र खुर्शिद यांच्या वक्तव्यानंतर ती शक्यता वाढली आहे.