कराची : टी-20 विश्वकरंडकाबाबत निर्णय घेता येत नसल्याची टीका पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याने केली असून आयपीएलला महत्त्व देण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य द्या, असे आवाहनही त्याने आयसीसीला केले आहे.
टी-20 विश्वकरंडक यंदा ऑस्ट्रेलियात होत आहे. करोनाच्या धोक्यामुळे हा विश्वकरंडक आयोजित करण्यास अडथळा येईल, असे मत ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने आयसीसीकडे व्यक्त केल्याने या स्पर्धेबाबतचा संभ्रम वाढला आहे. आयसीसीने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. यावरूनच आयसीसी बीसीसीआयच्या विरोधात जाऊ शकत नसल्याचेच सिद्ध होत आहे, असेही इंझमाम म्हणाला.
टी-20 विश्वकरंडक रद्द होण्याचे संकेत
टी-20 विश्वकरंडकासाठी ऑस्ट्रेलियात दाखल होणाऱ्या सर्व 18 संघांना सुविधा देणे शक्य नसल्याचे ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने आयसीसीला कळवले आहे. करोनाचा धोका कायम असताना तसेच मंडळाला आर्थिक फटका बसलेला असताना सर्व संघांना अशा सुविधा पुरवणे शक्य नसल्याचेही मंडळाने सांगितल्याने यंदाची टी-20 विश्वकरंडक स्पर्धा रद्दच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.