सातारा – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी आधुनिक पद्धतीचा अवलंब केल्यामुळे करोनाविषयक जनजागृतीसाठी पुस्तकांची अधिक छपाई करणे सुलभ झाले. 30 हजारांऐवजी 40 हजार पुस्तके छापण्यात आली. आतापर्यंत सुमारे अडीच लाख घडी पत्रके, प्रबोधन पुस्तके आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांमार्फत गावोगावी पोहचवून जनजागृती करण्याचे काम गतीने सुरू आहे.
नेहमी छपाई व्यवसायिकांना स्वतः संपर्क करावा लागतो. प्रत्यक्षात यावे लागते. परंतु आम्ही व्हॉट्सऍपवरून पुस्तकांचे दरपत्रक मागवले आणि ठराविक वेळ दिला. त्यामुळे व्हॉट्सऍपवरूनच संपर्क साधून किमान दरात पुस्तकांची छपाई करता येणे शक्य झाले. त्यामुळे वेळ, मनुष्यबळ आणि आर्थिक बचत झाल्यामुळे आणि कितीतरी जास्त पुस्तके छापून जनतेचा आणि शासनाचाही फायदा झाला असल्याची प्रतिक्रिया संजय भागवत यांनी व्यक्त केली. या आधुनिक पद्धतीमुळे छपाई व्यावसायिकांना धावपळ करावी लागली नाही, त्यांना यावे लागले नाही तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा संपर्कही टाळला गेला.
या पद्धतीमुळे सुलभता आली. आधुनिक पद्धतींचा वापर केल्यावर कार्यक्षमतेत आणि मनुष्य बळाच्या वापरामध्ये सुलभता येऊ शकते, जनतेचा फायदा होऊ शकतो हेच यामधून निदर्शनास येत असल्याचे भागवत यांनी स्पष्ट केले. आर्थिक बचत झाल्यामुळे नेहमीपेक्षा किती तरी जास्त पुस्तके छापता आली आणि अधिकाधिक जनतेपर्यंत पोहचता आल्याचे समाधान वाटते. सध्या करोनाची बिकट परिस्थिती आहे. असे असतानाही आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका गावोगावी जाऊन जनजागृती करत आहेत. लोकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन भागवत यांनी केले.
करोना ही मोठी आपत्ती असून सर्वांनी एकजुटीने याचा सामना करायचा आहे. सध्या देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये. हा रोग संसर्गाने पसरत असल्याने प्रशासन वेळोवेळी देत असलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.
– संजय भागवत (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा)