पुणे – शालेय शिक्षण विभागाने नर्सरीसाठी 3 वर्षे आणि इयत्ता पहिलीसाठी 30 सप्टेंबर रोजी 6 वर्ष पूर्ण झालेल्या बालकांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आता शाळा प्रवेशासाठी बालकांच्या किमान वयामध्ये जास्तीत जास्त 15 दिवसांची शिथिलता देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे बालकांच्या प्रवेशामध्ये सुसूत्रता येणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
याबाबतचा शासननिर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक आणि पूर्व प्राथमिकच्या प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. त्यानुसार राज्यातील केंद्रीय व राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये प्रवेशासाठीचे वय ठरविण्यात आले आहे. शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय 30 सप्टेंबर रोजी प्ले-ग्रुप आणि नर्सरीसाठी 3 वर्ष पूर्ण व इयत्ता पहिलीसाठी 6 वर्ष असे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली. मात्र, प्रवेशासाठी 30 सप्टेंबर रोजी अर्थात किमान वय पूर्ण होण्यास एक-दोन दिवस कमी असले तरी त्या मुलांना प्रवेश मिळत नव्हता. अशा विद्यार्थ्यांना पुढच्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घ्यावे लागत होती.
त्या पार्श्वभूमीवर बालकांच्या किमान वयामध्ये शिथिलता आणावी, अशी मागणी पालकांकडून होत होती. त्याबाबतचे निवेदनही शिक्षण विभागाकडे आली होती. त्याची दखल घेत किमान वयात सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.