नवी दिल्ली: लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुमारे 2400 भारतीय नागरिक श्रीलंकेत अडकून पडले आहेत. या भारतीयांना श्रीलंकेतून कधी मायदेशी आणले जाईल, याची अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. आपल्या सुटकेसाठी काय व्यवस्था केली गेली आहे, याची विचारणा करण्यासाठी या भारतीयांनी भारतीय दूतावासामध्ये असंख्य खेटे मारले आहेत.
मात्र, गेल्या दोन महिन्यात त्यांना कोणतीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही. या कालावधीमध्ये त्यांच्याकडील पैसेही संपत चालले आहेत. हे सर्वजण कधी परत येतील, याची त्यांच्या घरच्यांना काळजी लागून राहिली आहे.
करोनाशी संबंधित प्रवासी निर्बंधामुळे विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारने 7 मे रोजी ‘वंदे भारत’ अभियान सुरू केले. श्रीलंकेतील निर्वासितांना मायदेशी आणण्यासाठी अद्याप विमान प्रवासांची घोषणा करण्यात आलेली नाही. यातील काही भारतीयांकडील पैसेही संपत आले आहेत. भारतीय दूतावासाकडून अधिक वाट बघण्याचीच सूचना दिली जात आहे. हे वाट बघणे खूपच वेदनादायी आहे असे काही भारतीयांनी सांगितले.
काही जण केवळ सुट्टी घालवण्यासाठी श्रीलंकेत आले होते आणि लॉकडाऊनमुळे इथेच अडकून राहिले. चार दिवसांची सुट्टी त्यांना दोन महिन्यांपर्यंत वाढवावी लागली. काही जण टुरिस्ट व्हिसा घेऊन श्रीलंकेत आलेले आहेत. रोज सकाळी आपल्या सुटकेची चांगली बातमी मिळेल, अशी आशा त्यांना वाटते आहे.
“वंदे भारत’ अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सरकारने आखाती प्रदेशातून तसेच अमेरिका, ब्रिटन, फिलिपीन्स, बांगलादेश, मलेशिया आणि मालदीव या देशांमधून एकूण 6,527 भारतीयांना मायदेशी आणले आहे.
दुसऱ्या टप्प्यात कॅनडा, ओमान, कझाकस्तान, युक्रेन, फ्रान्स, ताजिकिस्तान, सिंगापूर, अमेरिका, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, कतार, रशिया, किर्गिस्तान, जपान, कुवैत आणि इटलीमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले जाणार आहे. याशिवाय नेपाळ, नायजेरिया, बेलारूस, आर्मेनिया, थायलंड, आयर्लंड, जर्मनी, जॉर्जिया आणि ब्रिटनमधील भारतीयांनाही मायदेशी आणले जाणार आहे.