जोधपूर – काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांवर लावण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतरही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत का आहेत? असा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, “देशातील न्यायपालिका संकटात आहे. संपूर्ण देशातील न्यायव्यवस्था या प्रकरणाने विचलित झाली असून देशाच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अशी घटना कधीच घडली नव्हती. असे असले तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याबाबत काहीही बोलत नाहीत.”
तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयामध्ये माजी कर्मचारी असलेल्या एका महिलेने सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप लावला आहे. या आरोपांना फेटाळून लावताना मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी या आरोपांमागे देशातील न्यायव्यवस्था उलथून टाकण्यासाठी ‘मोठी शक्ती’ कार्यरत असल्याचं म्हंटलं होतं.
दरम्यान, या प्रकरणावरून आज राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी, “केंद्रातील भाजप सरकारने गतवर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला गांभीर्याने घेतले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती.” अशी टीका केली आहे. यावेळी बोलताना गेहलोत यांनी पंतप्रधान व विधिमंत्र्यांनी याबाबत चर्चा करून तोडगा काढावा अशी सूचना देखील केली.