नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा (पीएमयूजे) विस्तार करण्यात येणार आहे. सरकार पाच किलाग्रॅम सिलिंडरच्या पूर्ततेसाठी भर देणार आहे.
या योजनेच्या लाभार्थी महिलांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भरघोस मतदान केल्याने सरकारला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. पीएमयूजे योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना मोफत गॅस जोडण्यांचे वाटप करण्यात आले होते. या सर्व जोडण्या महिलांच्याच नावे देण्यात आल्या होत्या.
या योजनेंतर्गत 8 कोटी गॅस जोडण्यांचे वाटप करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, नवीन सरकारच्या पहिल्या 100 दिवसांतच ते पूर्ण करण्यात येणार आहे. आतापर्यंत 7 कोटी 19 लाख जोडण्या देण्यात आल्या असून, येत्या 30 मे नंतर 100 दिवसांच्या आत 81 लाख गॅस जोडण्या दिल्या जाणार आहेत. हे लक्ष्य पूर्ण झाल्यानंतर 5 किलोचा छोटा सिलिंडर वापरणे अनिवार्य आहे.