पुणे – राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली “भारत जोडो’ नाही तर “भारत तोडो यात्रा’ आहे. कॉंग्रेसने भारत जोडो पेक्षा त्यांचा पक्ष मजबूत करायला हवा, असे सांगतच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सामना म्हणजे बच्चों का खेल नही हैं, अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर टिका केली.
एका कार्यक्रमानिमित्त आठवले पुण्यात आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौऱ्याबाबत ते म्हणाले, सीतारामन यांच्याकडे बारामती मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. बारामतीमध्ये बीजेपीचा खासदार निवडून आला पाहिजे, अशी इच्छा आमच्या एनडीएची आहे.
बारामतीची जागा नक्कीच शरद पवार यांची आहे. त्यांचे काम तेथे चांगले आहे. मात्र, आगामी निवडणुकीत इतिहास घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. चारशेपेक्षा जास्त जागा देशात निवडून आणण्यासाठी एनडीएची चाचपणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदूस्थानात चित्ते आणले असून, याबाबत आठवले यांना विचारले असता ते म्हणाले, चित्ते पाहण्यासाठी मीसुद्धा जाणार असून, त्यातील एखादा मिळाला तर घेऊन येणार असल्याची मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.
राज ठाकरेंनी वाद लावू नयेत
राज ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, “”राज ठाकरे यांनी कितीही दौरे केले तरी त्यांना फारसा राजकीय फायदा मिळत नाही. ते ऍक्टीव्ह नेते आहेत. मात्र, त्यांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद लावू नयेत. सुरुवातीला त्यांच्या झेंड्यामध्ये हिरवा, निळा रंग होता. मात्र, आता ते एकाच रंगाकडे वळले आहेत.