पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याबद्दल प्रशंसोद्गार काढले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
मोदींनी विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्याचे कौतुक करणे, ही तशी रंजक घडामोड आहे. याच पद्धतीने त्यांनी संसदेत गुलाम नबी आझाद यांचेही कौतुक केले होते आणि त्यानंतर काय झाले हे आपल्या सर्वांसमोर आहे, असे उद्गार राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काढले आहेत. थोडक्यात, ही घटना हलक्यात घेऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. अर्थात, पायलट यांच्या या टीकेनंतरही गेहलोत यांनी त्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले जावे, असे मत व्यक्त करून, आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे गेहलोत यांनी अधोरेखित केले आहे. मात्र आझाद यांच्याप्रमाणे गेहलोत हे कधीही पक्षाबाहेर पडू शकतात, त्यामुळे त्यांच्यावर भरोसा ठेवू नये, असेच पायलट सुचवत आहेत. विधानसभा निवडणुकीला अवघे तेरा महिने शिल्लक आहेत. म्हणून अखिल भारतीय कॉंग्रेस समितीने लवकर कोणता तरी निर्णय घ्यावा. त्यासाठी विधिमंडळ पक्षाची पुन्हा बैठक बोलवावी, अशी मागणी पायलट यांनी केली.
गेल्यावेळी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती, तेव्हा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने निरीक्षक म्हणून मल्लिकार्जुन खर्गे व अजय माकन गेले होते. परंतु त्यावेळी गेहलोत समर्थकांनी बंड केले आणि बहुसंख्य आमदार गेहलोत यांच्यामागेच आहेत, हे दाखवून दिले. या बंडामुळे तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी प्रचंड संतापल्या होत्या. वास्तविक गेहलोत यांना निवडणुकीद्वारे कॉंग्रेस अध्यक्ष करावे आणि मुख्यमंत्रिपदी सचिन पायलट यांना बसवावे, अशी योजना होती. परंतु गेहलोत यांनी त्यास सुरुंग लावला. याचे कारण, त्यांना राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सोडायचेच नव्हते. वर्षानुवर्षे सत्ता भोगल्यानंतरही कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना सत्ता सोडावीशी वाटत नाही. या प्रवृत्तीमुळेच कॅंग्रेसची अवनती झाली आहे. भारतीय जनता पक्षात अशा प्रकारची बेशिस्त दिसून येत नाही आणि स्वार्थापेक्षा पक्षाला महत्त्व देणारे अनेक नेते त्या पक्षात आहेत. भाजपच्या नावाने अहोरात्र शिमगा करणाऱ्या कॉंग्रेसजनांनी त्या पक्षाचे गुण तरी घेतले पाहिजेत. आता खर्गे हे कॉंग्रेसचे अध्यक्ष बनले असून, राजस्थानचा पेच ते कसा सोडवतात, हे बघावे लागेल.
राजस्थानातील कॉंग्रेस पक्षात दोन गट पडले असून, यापूर्वी पायलट हे भाजपच्या मदतीने बंड करण्यास प्रवृत्त झाले होते. आता ते हाच आरोप गेहलोत यांच्यावर करत आहेत. गेहलोत यांच्या व्यक्तिमत्त्वाची जाहीर प्रशंसा करून मोदी यांनी कॉंग्रेसमध्ये यशस्वीपणे संशयाचे बीज पेरले. 2018 साली राजस्थानात कॉंग्रेसची पुन्हा एकदा सत्ता आली, त्यास पाच वर्षे प्रदेशाध्यक्ष या नात्याने, पायलट यांनी घेतलेले कष्ट मोठ्या प्रमाणात कारणीभूत होते. वास्तविक तरुण, तडफदार पायलट यांना तेव्हाच मुख्यमंत्रिपद मिळायला हवे होते. परंतु गेहलोत यांच्या मागे जास्त आमदार असल्यामुळे पायलट यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले. अल्पावधीत मुख्यमंत्र्यांबरोबर मतभेद होऊन त्यांनी हे पदही सोडले. कोणत्याही परिस्थितीत राजस्थान कॉंग्रेसमध्ये वा सत्तेत पायलट यांना महत्त्व मिळू नये, हीच गेहलोत यांची इच्छा आहे.
वास्तविक पायलट यांना काही काळाने मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले होते. परंतु राहुल यांनी 2019च्या पराभवानंतर पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. शिवाय राहुल असोत, वा सोनिया गांधी त्यांच्या शब्दाला असलेले वजनच कमी झाले. याचे कारण, त्यांच्या करिश्म्यावर पक्षाला विजय मिळेनासा झाला. गेहलोत यांनी मुख्यमंत्रिपद सोडावे व पक्षाध्यक्ष व्हावे, ही श्रेष्ठींची इच्छा होती. परंतु पक्षाध्यक्ष झाले, तरी मुख्यमंत्रिपद स्वतःकडे ठेवण्याकडे गेहलोत यांचा कल होता. वास्तविक गेहलोत यांची पक्षाध्यक्षपदी निवड होण्यापूर्वीच नव्या नेत्याच्या निवडीसाठी विधिमंडळ कॉंग्रेस पक्षाची बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्याचे कारण नव्हते.
प्रणव मुखर्जी, पी. चिदंबरम किंवा अगदी गुलाम नबी आझाद यांच्यासारखे ज्येष्ठ नेते कॉंग्रेस पक्षात पूर्वी निर्णयप्रक्रियेत होते, तेव्हा या प्रकारच्या घोडचुका केल्या जात नव्हत्या. परंतु ही बैठक बोलावण्यात आल्यानंतर त्या बैठकीवरच 92 आमदारांनी बहिष्कार घातला आणि सर्वांनी विधानसभा अध्यक्षांकडे जाऊन, आपण राजीनामा देणार असल्याचे सांगितले. हे उघड उघड पक्षश्रेष्ठींविरुद्धचे बंडच होते आणि त्याला गेहलोत यांची फूस होती. कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी ज्याचे नाव होते, अशा गेहलोत यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानेच या प्रकारच्या बेशिस्तीस फूस द्यावी, ही अत्यंत गंभीर गोष्ट होती. वास्तविक गेहलोत यांना मुख्यमंत्रिपदावरून ताबडतोब दूर करून, आमदारांच्या इच्छेने दुसऱ्या कोठल्याही नेत्याची निवड होणे आवश्यक आहे. परंतु तसे केल्यास राजस्थानमधील पक्ष फुटेल आणि अनेकजण भाजपात जातील, अशी भीती खर्गे यांना वाटत असावी. राजस्थानात “इकडे आड तिकडे विहीर’, अशी कॉंग्रेसची अवस्था आहे.
महाराष्ट्रातही विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसची मते फुटली होती आणि त्याबाबत चौकशी समितीही नेमण्यात आली. परंतु या समितीचा अहवाल बाहेर येऊनदेखील कोणतीही कारवाई झाली नाही. कारण कारवाई झाली, तर हे बंडखोर भाजपात जातील, ही भीती वाटत असावी. कॉंग्रेसची एवढी दुरवस्था यापूर्वी कधीही झाली नव्हती.