कराड : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने-सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. दिल्लीतील या हिसेंत आतापर्यंत एका शेतकऱ्याचा जीव गेले आहे. यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे.
दिल्ली येथे सुरू असलेले शेतकऱ्यांचं आंदोलन हिंसक होण्याला संपूर्णपणे केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत, असं म्हणत काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. या घटनेची तीव्र शब्दात निंदा करत असून, मोदी सरकारने हटवादीपणा सोडून कृषी विधेयक मागे घ्यावीत, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे बहुमत नसताना पास केले आहेत. त्याला देशभरातील शेतकरी आणि राजकीय मंडळी विरोध करतायत. पंजाबचे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेले दोन महिने कडक थंडीमध्ये बसून आहेत आणि ते परत घरी जायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत केंद्र सरकार विनवणी करतंय. चर्चेच्या फेऱ्या झडतायत. त्यातून काही मार्ग निघत नाही. मोदींच्या हटवादीपणामुळे यातून काहीही तोडगा निघत नसल्याचेही चव्हाण यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना आधी विश्वासात घ्या, मगच कायदे करा अस आवाहन त्यांनी केले.