नवी दिल्ली, – भारतीय खेळणी महोत्सव 2021 हे आत्मनिर्भर भारताची निर्मिती आणि भारताच्या पुरातन परंपरा अधिक दृढ करण्याच्या दिशेने टाकलेले महत्वाचं पाऊल आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिल्या “इंडिया टॉय फेअर’ अर्थात भारतीय खेळणी महोत्सवाचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केले, त्यावेळी ते बोलत होते. हा महोत्सव केवळ व्यावसायिक किंवा आर्थिक उपक्रम नाही तर, भारताच्या पुरातन क्रीडा आणि खेळाच्या संस्कृतीचे बंध अधिक दृढ करायचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
भारतात तयार होणारी खेळणी ही परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतात, तसंच ही खेळणी पर्यावरणपूरक उत्पादनांपासून बनवली जातात, त्यामुळे ती सुरक्षितही असतात असे त्यांनी सांगितले. यापुढेही भारतातल्या खेळणी उत्पादकांनी पर्यावरणपुरक आणि मनस्वास्थ्याला अनुकूल असतील अशी खेळणी बनवावित असे आवाहन त्यांनी केले. भारतीय खेळण्यांमुळे मनोरंजनही होते, तसेच अगदी सोप्या पद्धतीने वैज्ञानिक सिद्धांतही समजून घेता येतात, असे त्यांनी सांगितले. लहान मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत खेळणी महत्वाची भूमिका बजावत असतात, त्यामुळे पालकांनी मुलांशी खेळायला हवे असे आवाहन त्यांनी केले.
बुद्धीबळासह अनेक आंतरराष्ट्रीय खेळ आणि क्रीडा प्रकार भारताने जगाला दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. भारताच्या खेळणी उद्योग जगताची अफाट क्षमता दडलेली आहे, आत्मनिर्भर भारत अभियानाच्या माध्यमातून या क्षमता अधिक पटीनं वाढवली जाईल आणि या उद्योगक्षेत्राची ओळख अधिक ठळक केली जाईल असेही त्यांनी सांगितले.