नवी दिल्ली – इंडोनेशियातील बाली येथे सुरु असलेल्या जी-20 शिखर परिषदेत आज भारताने अधिकृतपणे जी-20चे अध्यक्षपद स्वीकारले आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोकोवी विडोडो यांनी जी-20चे अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वाधीन केले आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी इंडोनेशिया यजमान देशाने पुढील वर्षभरासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी भारताकडे सोपवली आहे.
यावेळी जोकोवी यांचे अभिनंदन करत मोदी म्हणाले की, जी-20 चे अध्यक्षपद स्वीकारणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आमच्या पाहुण्यांना भारतातील आश्चर्यकारक विविधता, सर्वसमावेशक परंपरा आणि सांस्कृतिक समृद्धीचा पूर्ण अनुभव मिळेल. “मदर ऑफ डेमोक्रसी’ या भारतातील अनोख्या उत्सवात आपण सर्वांनी सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे. आपण एकत्रितपणे या जी -20 परिषदेला जागतिक बदलासाठी अधिक प्रेरक बनवू, असे आवाहनही त्यांनी केले.
राजगृहाचा ऐतिहासिक ठेवा जोपासणार – एकनाथ शिंदे
जग एकाच वेळी भू-राजकीय तणाव, आर्थिक मंदी, अन्न आणि ऊर्जेच्या वाढत्या किंमती आणि साथीच्या रोगाचे दीर्घकालीन दुष्परिणाम यांच्याशी झुंजत असताना भारत जी-20 चे अध्यक्षपद स्वीकारत आहे. अशा वेळी जग जी -20 कडे आशेने पाहत आहे. भारताचे जी-20 परिषदेचे अध्यक्षपद सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित असेल, अशी खात्री मोदींनी व्यक्त केली आहे.
पुढील एका वर्षात, नवनवीन कल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि सामूहिक कृतीला गती देण्यासाठी जी-20 परिषद एक जागतिक मुख्य प्रवर्तक म्हणून काम करेल याची ग्वाही देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. नैसर्गिक स्त्रोतांवर मालकीची भावना आज संघर्षाला जन्म देत आहे आणि हेच पर्यावरणाच्या विनाशाचे मुख्य कारण बनले आहे. पृथ्वी ग्रहाच्या सुरक्षित भविष्यासाठी, विश्वस्तपणाची भावना हा उपाय आहे. “लाइफ’ अर्थात “पर्यावरणासाठी जीवनशैली’ मोहीम यामध्ये मोठे योगदान देऊ शकते. शाश्वत जीवनशैलीला लोकांची चळवळ बनवणे हा त्याचा उद्देश असल्याचेही मोदींनी स्पष्ट केले.
महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला प्राधान्य
विकासाचे फायदे सार्वत्रिक आणि सर्वसमावेशक असण्याची आज गरज आहे. आपण विकासाचे फायदे सर्व मानवांना करुणेच्या भावनेने आणि एकजुटीने पोहोचवायचे आहेत. महिलांच्या सहभागाशिवाय जागतिक विकास शक्य नाही. आम्हाला आमच्या जी-20 कार्यक्रम पत्रिकेतही महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला प्राधान्य द्यायचे आहे. शांतता आणि सुरक्षिततेशिवाय, आपल्या भावी पिढ्या, आर्थिक विकासाचा किंवा तांत्रिक नवकल्पनांचा लाभ घेऊ शकणार नाहीत. जी -20 ला शांतता आणि सौहार्दाच्या बाजूने दृढ संदेश द्यायचा आहे. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या भारताच्या जी -20 अध्यक्षपदाच्या संकल्पनेमध्ये हे सर्व प्राधान्यक्रम पूर्णपणे समाविष्ट आहेत, असेही मोदी म्हणाले.