नवी दिल्ली – गुजरात दंगल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य 63 जणांना देण्यात आलेल्या क्लिन चीटवर सर्वोच्च न्यायालयानेही काल शिक्कामोर्तब केले. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाटके करत नाहीत असे शहा यांनी म्हटले आहे.
दंगल प्रकरणात विशेष तपास पथकाने जेव्हा चौकशीसाठी समन्स पाठवले तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. ते चौकशीसाठी हजर झाले. घटनेचा आदर कसा करायचा याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले. ते एकटे शांतपणे चौकशीसाठी गेले. त्यावेळी कोणी धरणे धरले नाही किंवा आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत हे सिध्द करण्यासाठी कोणी तपास संस्थेच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली नाही याकडे शहा यांनी लक्ष वेधले.
राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू होती. तेव्हा त्यांच्यासोबत कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्तेही जात होते व ईडीच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत असायचे. त्या अनुशंगाने शहा यांनी ही टिप्पणी केली. मोदींना असली नाटके करता येत नाहीत. चौकशीत सहकार्य करण्यास ते स्वत: तयार असायचे. निदर्शने कशाला केली जातात असा सवाल त्यांनी केला.
तसेच मोदी यांच्यावर आरोप करणाऱ्यांची सद्विवेक बुध्दी शाबुत असेल तर त्यांनी या प्रकरणात माफी मागावी अशी मागणीही शहा यांनी केली. तब्बल 19 वर्षे मोदी यांनी या सगळ्याचा त्रास सहन केला. आपण हे सगळे जवळून पाहिले नाही. मात्र काहीही न बोलता त्यांनी तो त्रास सहन केला असेही शहा यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, कारसेवक प्रवास करत असलेली रेल्वेगाडी जाळणे हेच दंग्याचे मुख्य कारण होते. मी स्वत: हॉस्पिटलमध्ये गेलो होतो.
सगळीकडे मृतदेह होते. एक लहान मुलगी तिच्या आईसोबत जळून गेली होती. ती 16 दिवसांची मुलगी आणि 60 जणांना मी जळताना पाहिले होते. माझ्या हातांनी मी अंत्यसंस्कार केले. ज्या प्रकारे या 60 जणांचा मृत्यू झाला त्यामुळे समाजात आक्रोश होता. मात्र या घटनेवर तेव्हा कोणी टीका केली नाही. तेव्हा संसदेचे अधिवेशन सुरू होते. पण कॉंग्रेसने कोणतेही निवेदन दिले नाही. दंगे झाल्यावर मात्र टीका सुरू झाली.