कोलकाता : कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या 150 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शहरात आगमन झाले. ते दोन दिवसाच्या मुक्कामावर आहेत. राज्यपाल जगदीप धानकर, कोलकात्याचे महापौर आणि मंत्री फिऱ्हाद हकीम आणि अन्य मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान पंतप्रधान येण्याआधी प. बंगालमध्ये डाव्या पक्षांकडून गो बॅक मोदीच्या घोषणा देत राज्यभर आंदोलन करण्यात आले. अनेक ठिकाणी पंतप्रधानांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करण्यात आले.
डाव्या पक्षांशी संबंधित विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते गोलपार्क आणि जाधवपूर येथे जमा झाले. त्यांनी पंतप्रधानांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. फलकबाजी केली. हुकुमशाही विरूध्द विद्यार्थी या बॅनरखाली हे विद्यार्थी एकत्र आले आहेत.
दरम्यान पंतप्रधान प. बंगालमध्ये 21 तास वास्तव्य करणार आहेत. कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या वारसा इमारतीचे लोकार्पण करतील. रविंद्र सेतूच्या ध्वनी आणि प्रकाश योजनेचे ते उद्घाटन करतील. रामकृष्ण मिशनचे मुख्यालय असणाऱ्या बेलुर मठाला मठाला भेट देतील.
पश्चिम बंगालच्या आज आणि उद्या होणाऱ्या भेटीसाठी मी उत्सुक आहे. स्वामी विवेकानंद यांची जयंती असताना रामकृष्ण मिशनमध्ये वेळ घालवता येणार असल्याने मी आनंदी आहे. हे माझ्यासाठी खास ठिकाण आहे, असे पंतप्रधान म्हणाले आहेत.
आता त्यात एक खंतही असेल! जनसेवा हीच प्रभूसेवा ही ही वैश्विक शिकवण मला ज्यांनी दिली ते पुजनीय स्वामी अत्मस्थानंदजी तेथे नसतील. मी रामकृष्ण मिशनमध्ये जातोय आणि तेथे त्यांचे पवित्र अस्तीत्व नाही, हे कल्पनेच्या पलिकडचे आहे, असेही मोदी म्हणाले. लोकसभा निवडणुकीनंतर ममता आणि मोदी यांनी एकाही व्यासपीटावर हजेरी लावलेली नाही. मात्र कोलकात्यात उद्या होणाऱ्या कार्यक्रमात हे दोन्ही नेते एका व्यासपीटावर येण्याची शक्यता आहे.