नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (रविवार) तामीळनाडू आणि केरळचा दौरा करणार आहेत. त्यावेळी त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण होईल. ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर होणाऱ्या त्या दौऱ्याला भाजपच्या मिशन साऊथचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
मोदी तामीळनाडू आणि केरळमध्ये अनेक प्रकल्पांचा प्रारंभ करतील. त्यामध्ये चेन्नई मेट्रोचा विस्तार, रेल्वे मार्गाचे उद्घाटन, रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण, पेट्रोकेमिकल प्रकल्प, रोरो सेवा जहाजांचे लोकार्पण आदींचा समावेश आहे. त्याशिवाय, मोदींच्या हस्ते अत्याधुनिक अर्जुन रणगाडा लष्कराकडे सुपूर्द केला जाईल. त्यामुळे मोदींचा दौरा तामीळनाडू आणि केरळच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मानला जात आहे. मात्र, त्या दौऱ्याच्या टायमिंगमुळे त्याचा संबंध राजकीय विश्लेषक निवडणुकांशीही जोडत आहेत. दोन्ही राज्यांत एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणुका अपेक्षित आहेत. त्यामुळे त्या राज्यांमधील जनतेपर्यंत पोहचण्यासाठी भाजपच्या दृष्टीने मोदींचा दौरा राजकीय फायद्याचा ठरणार आहे. तामीळनाडू आणि केरळ या दक्षिणेतील राज्यांत भाजपची फारशी राजकीय ताकद नाही. मात्र, निवडणुकांवेळी जनतेला सामोरे जाताना भाजपला मोदींच्या दौऱ्याचा मोठा आधार घेता येईल.