नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर तालिबानने पूर्ण ताबा मिळवल्यानंतर जगामध्ये एकच गोंधळ उडाला होता. त्यातच संपूर्ण जगभरातून यावर प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यावर अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे. मात्र त्यांचे भाष्य हे तालिबानच्या चांगलेच जिव्हारी लागले असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच तालिबांकडून मोदींच्या वक्तव्याला तालिबानने गांभीर्याने घेतले असल्याचे दिसत आहे.
‘दहशतवादाची सत्ता फार काळ टिकत नसते’, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे वक्तव्य तालिबानला चांगलेच लागले आहे. तालिबानचा म्होरक्या शहाबुद्दीन दिलावरने मोदींचे हे वक्तव्य आव्हान म्हणून स्वीकारले आहे. तसेच आपली संघटना भविष्यत नक्कीच यशस्वी होईल, असा दावादेखील त्याने केला आहे.
पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दिलावर म्हणाला, की तालिबान चांगल्या प्रकारे देश चालवू शकतो, हे भारताला लवकरच दिसेल. मोदींनी सोमनाथ मंदिराशी संबंधित अनेक विकास कामांच्या उद्घाटन आणि पायाभरणी कार्यक्रमादरम्यान तालिबानचा उल्लेख न करता हे वक्तव्य केले होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले होते, ‘भगवान सोमनाथांचे मंदिर आज केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एक विश्वासाचे केंद्र आहे. ज्या विध्वंसक शक्ती आहेत… दहशतीच्या बळावर सामर्थ्य निर्माण करणारा जो विचार आहे… तो एखाद्या कालखंडात भलेही बरचढ ठरो, मात्र, त्याचे अस्तित्व फार काळ नसते. तो फार काळ मानवतेला दाबू शकत नाही. पंतप्रधानांच्या या वक्तव्याकडे अफगाणिस्तानातील परिस्थितीला जोडून पाहिले गेले.