दिल्ली – छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रायगड किल्ल्यावर मोठी तयारी करण्यात आली आहे. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. महाराष्ट्रातील अनेक नेते मंडळी रायगड किल्ल्यावर राज्यभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहिले आहेत. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मराठीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नरेंद्र मोदी म्हणाले की, “मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नमन करतो. आज स्वराज्याची पहिली राजधानी रायगड किल्ल्याच्या प्रांगणात सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जात आहे. यासाठी मी महाराष्ट्र सरकारलाही शुभेच्छा देतो. शिवरायांनी कायम एकतेला महत्व दिले आहे. शिवाजी महाराज यांनी केवळ परकियांचे आक्रमण रोखले नाही, तर नवराष्ट्रनिर्माण करण्यासाठी जनतेला प्रेरित केले.”
पुढे ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा एक अद्भुत अध्याय आहे. यासंदर्भातील महान गाथा आपल्याला आजही प्रेरणा देतात. शिवाजी महाराजांच्या न्यायप्रियतेनं अनेक पिढ्यांना प्रेरित केले आहे. त्यांचे साहस, सामुद्रिक कौशल्य आणि शांतीपूर्ण राजनिती आजही आपल्यासाठी प्रेरणास्रोत आहे. आपल्याला या गोष्टीचा गर्व आहे की जगाच्या अनेक देशात आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीची चर्चा होते आणि त्यावर संशोधन होते.”
Chhatrapati Shivaji Maharaj is a beacon of courage and bravery. His ideals are a source of great inspiration. https://t.co/eQZgsyTMm4
— Narendra Modi (@narendramodi) June 2, 2023
दरम्यान, या कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांच्या राष्ट्रीय स्मारकाबद्दल मोठी घोषणा केली आहे. देशाची राजधानी दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याकरिता लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.