मुंबई – देशभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींबद्दल भावना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले होते. पण, पंतप्रधान मोदी हे मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करताना नेहमीच उपरणे आणि मास्कचा वापर करत होते. मात्र त्यादिवशी त्यांनी उपरणे आणि मास्क दोन्ही वापरले नाही याचा अर्थ हा ठरवून झालेला कार्यक्रम होता, असा आरोपही नवाब मलिक यांनी मोदींवर केला आहे.
कोरोना महामारीमुळे देशात लाखो संख्येने लोकांनी आपले जीव गमावले. या काळात अनेकांना औषधोपचार मिळत नाही. केंद्र सरकार व बहुतांश राज्य सरकारांच्या हलगर्जीपणामुळे अनेकांना जीव गमवावे लागले. शासनाच्या विरोधात विशेषत: मोदी सरकारच्या विरोधात जनआक्रोश निर्माण होत आहे. अशातच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. परंतु ते खरंच भावूक झाले की हे चित्र निर्माण करण्यात आले, याबाबत आता लोकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
दरम्यान पंतप्रधान खरंच भावूक झाले की ठरवून झाले याचे उत्तर आणि नेमकं खरं काय आहे हे मोदीच सांगू शकतील, असा टोलाही मलिक यांनी लगावला आहे.