नवी दिल्ली – गुजरात विधानसभेची निवडणूक आम्ही भलेही हरलो असू. मात्र आमच्यामुळे भारतीय जनता पार्टीत एवढे भीतीचे वातावरण होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्यांच्या राज्यात 50 किलोमीटरचा रोड शो करावा लागला अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांनी दिली आहे.
प्रशांत किशोर यांची नितीश कुमार यांच्यावर टीका; म्हणाले, पंतप्रधानपद लांबच, मुख्यमंत्रिपदावरही…
गुजरातमध्ये झालेला पराभव आणि अपेक्षेनुरूप कामगिरी करता न आल्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चढ्ढा म्हणाले की आमच्यामुळेच मोदींना रस्त्यावर उतरावे लागले आणि घाम गाळावा लागला. केवळ इतकेच नाही तर आम आदमी पक्षाच्या प्रचारामुळेच भाजपच्या सगळ्याच नेत्यांना आपली ताकद पणाला लावावी लागली. आम्हाला विजय मिळाला नाही हे जरी खरे असले तरी आमचे जे आमदार निवडून आले आहेत ते आपापल्या भागात अत्यंत कर्मठपणे काम करतील.
प्रशांत किशोर यांची नितीश कुमार यांच्यावर टीका; म्हणाले, पंतप्रधानपद लांबच, मुख्यमंत्रिपदावरही…
दरम्यान, एका वाहिनीच्या कार्यक्रमात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी अगदी नाट्यमय रित्या आपली भविष्यवाणी लेखी स्वरूपात मांडली होती. त्याबाबत बोलताना चढ्ढा म्हणाले, ही आमच्या पक्षाची रणनिती होती. प्रत्येक पक्ष हा जिंकण्यासाठीच निवडणूक लढत असतो. पराभूत होण्यासाठी कोणी लढत नाही. आणि अरविंद केजरीवाल यांनी लिहून दिल्याचा जर प्रश्न असेल तर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी त्या अगोदर बऱ्याच वेळा असे केले आहे.
बंगालच्या निवडणुकीत आम्हीच विजयी होणार असे लिहून देण्याचा दावा शहा करायचे. हा एक रणनितीचा भाग असतो. आम्हाला गुजरातमध्ये आमच्या उपस्थितीची जाणीव मोठ्या प्रमाणावर करून द्यायची होती व तशी ती आम्ही केली. ज्या राज्याला भारतीय जनता पार्टीचा अभेद्य गड मानले जाते त्या राज्यात आम आदमी पक्षाचे 5 आमदार विजयी होणे आणि पक्षाला 13 टक्के मते मिळणे ही क्षुल्लक गोष्ट नाही.