वाहतूक कोंडी फुटण्याची चिन्हे
पुणे – सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विठ्ठलवाडी कमान ते माणिक बागेपर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेकडून जिओ टेक्निकल सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होण्याची चिन्हे आहेत. या उड्डाणपुलासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती स्थानिक नगरसेविका मंजुषा नागपुरे, नगरसेवक प्रसन्न जगताप यांनी दिली.
सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली आहे.खडकवासलापर्यंत जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्याने धायरी राजारामपूल ते वडगाव फाट्यापर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन विठ्ठल मंदिर ते गंगा भाग्योदयपर्यंत उड्डाणपूल उभारण्याची मागणी या भागातील नगरसेवक करत होते. त्यानुसार आर्थिक तरतूद केल्यानंतर मागील वर्षी सल्लागार नेमण्यात आला होता. त्यांनी अहवाल दिला असून त्यानुसार आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने पुलाच्या कामासाठी जमिनीचा पोत तपासण्यात येत असून लवकरच निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाणार आहे.
वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार
या रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या उड्डाणपुलाची मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र, अंदाजपत्रकात तरतूदच केली जात नसल्याने, तसेच तरतूद अपुरी केली जात असल्याने हे काम मार्गी लागण्यात अडचणी होत्या. गेल्या दोन वर्षांत या पुलासाठी सुमारे 7 कोटींची अंदाजपत्रकीय तरतूदही होती. मात्र, यातून हे काम शक्य नसल्याने ते पुढे ढकलले जात होते. मात्र, स्थानिक नगरसेवकांनी मुख्यसभा तसेच स्थायी समितीत वारंवार प्रशासनाकडे विचारणा केल्याने मागील वर्षी या कामासाठी सल्लागार नेमण्यात आला. तर या वर्षी निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन वर्षांत हा पूल पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.