मुंबई – भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडियाने आपल्या विविध वाहनानांच्या दरात 0.9 ते 1.9 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. कच्च्या मालाचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे आम्हाला ही दरवाढ करावी लागत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मारुती सुझुकी कंपनीने जानेवारी 2021 ते मार्च 2022 या कालावधीत टप्प्याटप्प्याने आपल्या वाहनाच्या घरात 8.8 टक्क्यापर्यंत वाढ केली होती. आता त्यामध्ये आणखी 1.9 टक्क्याची भर पडली आहे.
आज जाहीर करण्यात आलेल्या दरवाढीची अंमलबजावणी तात्काळ केली जाणार असल्याचे या कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीने शेअर बाजारात दाखल केलल्या माहितीत म्हटले आहे की पोलाद, तांबे, ऍल्युमिनियम इत्यादीच्या किमती जागतिक पातळीवर वाढत आहेत. त्याचबरोबर रुपया कमकुवत झाल्यामुळे ही उत्पादने भारतात आणखी महाग होत आहेत.
याअगोदरच महिंद्रा, टोयोटा किर्लोस्कर मोटार, ऑडी, मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू या कंपन्यांनीही याच कारणामुळे आपल्या विविध उत्पादनाच्या दरामध्ये वाढ जाहीर केली आहे. युद्ध लवकर थांबले नाही तर आणखी दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे समजले जात आहे.