पारनेर – गेल्या काही दिवसांपासून पारनेर तालुक्यात किराणा मालाची चढ्या भावाने विक्री होत असल्याने सर्वसामान्या नागरीकांची आर्थिक लूट होत आहे. घाऊक विक्रेत्यांनी साठेबाजी सुरू केली असून त्यामुळे किरकोळ व्यावसायिकांना नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत घाऊ विक्रेत्यांना समज देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तालुक्यातील निघोज व परिसरातील मोठ्या व्यवसायिकांकडे किराणा मालाचा सर्वाधिक साठा असण्याची शक्यता व्यक्त होत असून त्यांना कडक समज द्यावी, अन्यथा साठेबाजी केल्याबद्दल कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. निघोज व परिसरातील लोकसंख्या पंचवीस ते तीस हजार आहे. या परिसरात किरकोळ विक्री करणारे पन्नासपेक्षा जास्त दुकानदार आहेत. व होलसेल दराने विक्री करणारे पाच ते सहा मोठे व्यवसायिक आहेत. मात्र करोनामुळे शहरातील दुकानदार माल पाठवत नाही.या सबबीखाली हे मोठे व्यवसायिक छोट्या दुकानदारांना माल देत नाही आणि दिला तर भाव वाढवून देतात. पर्यायाने या छोट्या दुकानदारांना किराणा असो वा इतर वस्तू जास्त दराने ग्राहकांना द्यावे लागते.त्यातून गरीब व गरजू लोकांना आर्थिक भुर्दंड पडतो. लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील रोजंदारीचे सर्व कामे बंद आहेत. तब्बल वीस ते पंचवीस दिवस घरातील लहानमोठे असे पाच ते सहा माणसे घरातच बसून आहेत.
पाच ते दहा हजाराची बचत संपत चालली आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात किराणा माल जास्त किमतीने घ्यावा लागतो, अशी बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे लॉकडाऊन कधी संपतो व त्यावरील शिथिलता कमी कधी होणार याचीच वाट पहात सर्वसामान्यांना घरात बसावे लागत आहे. अशाप्रकारे करोना, बेताची परिस्थिती अशा दुहेरी संकटात सर्वसामान्य माणूस अडकला असून होलसेल किराणा व्यवसायिकांना समज देवून किराणा असो वा इतर मालाचा स्टॉक विक्रीसाठी तत्काळ भाग पाडण्यासाठी प्रशासनाने मदत करावी व सर्वाधिक साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
गोरगरिबांची आर्थिक लूट
निघोज परिसरात दारू घरपोच मिळते. सुगंधी तंबाखू असो, की गुटखा राजरोस जास्त किमतीत मोबाईल सेवेच्या माध्यमातून मिळतात. हे घेणारे श्रीमंत लोक आहेत, मात्र शंभर, दोनशेचा किराणा घेवून आठ दिवस त्या किराण्यावर गुजरान करणाऱ्या समाजातील गोरगरीब गरजू घटकांना न्याय मिळत नाही. या वस्तू मिळाल्या तर त्यांना त्या जास्त भावाने घ्याव्या लागतात. याची पाळेमुळे खणून काढण्याचे काम प्रशासनाने करावीत, अशी मागणी होत आहे.