नवी दिल्ली – इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढण्यासाठी केंद्र सरकार अनेक पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढेल. त्याचबरोबर पुढील दोन वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनाइतक्या कमी होतील, असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी केला आहे.
या विषयावरील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, सध्या भारत आठ लाख कोटी रुपयांच्या कच्च्या तेलाची आयात करतो. एकूण परिस्थिती पाहता पुढील काही वर्षांमध्ये आपण पर्यायी उपाययोजना केल्या नाहीत तर 25 लाख कोटी रुपयाच्या कच्च्या तेलाची आयात करावी लागणार आहे.
त्याचबरोबर पर्यावरणाचे नुकसान होते. त्यासाठी पर्यायी इंधनाला चालना देण्यासाठी गेल्या काही वर्षापासून केंद्र सरकार राज्यांच्या मदतीने प्रयत्न करीत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढेल. इलेक्ट्रिक वाहनांच्या तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहे. त्याचबरोबर वाहनांची विक्री वाढल्यानंतर या वाहनांच्या किंमती कमी होण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, सध्या पेट्रोलवरील वाहन चालविण्यासाठी महिन्याला 15 हजार रुपये खर्च येत असेल तर इलेक्ट्रिक वाहन चालवणसाठी केवळ 2 हजार रुपये खर्च येतो. या बाबी ग्राहकांना समजू लागल्या आहेत.