नवी दिल्ली – उत्पादन वाढत असल्यामुळे आणि केंद्र सरकारने योग्यवेळी हस्तक्षेप केल्यामुळे विविध भाज्यांचे आणि खाद्य तेलाचे दर नियंत्रणात आहेत असा दावा केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी केला.
खाद्यतेलाचे अगोदरच नियंत्रणात असताना आता मोहरीचे पीक बाजारात येणार असल्यामुळे खाद्य तेलाच्या किमती आणखी कमी होणार आहेत. कांदे, बटाटे आणि टोमॅटो पाऊस कमी झाल्यामुळे नियंत्रणात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तांदूळ आणि गव्हाचे दर सुरुवातीपासूनच स्थिर आहेत.
त्यामुळे या खाद्यपदार्थांचे दर नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले. एकूण परिस्थिती पाहता आगामी काळात या अन्न घटकाच्या किमती वाढणार नाहीत याची आम्हाला खात्री असल्याचे पांडे म्हणाले.
खाद्यतेलाच्या किमतीबाबत त्यांनी सांगितले की, खाद्यतेलाबाबत भारत 60 टक्के आयातीवर अवलंबून आहे. त्यामुळे जागतिक दराचा भारतातील दरावर थोडाफार परिणाम होणे अपेक्षित आहे. खाद्य तेलाचे दर कमी करण्यासाठी सरकारने खाद्यतेलाच्या विविध घटकावरील आयात शुल्क बऱ्याच प्रमाणात कमी केले आहे.
त्यामुळे परिस्थिती सकारात्मक झाली आहे. आयात शुल्क कपात केल्याने त्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी खाद्य तेलाचे दर कमी करावेत असे व्यापाऱ्यांना अनेक वेळा सांगितल्यानंतर आता खाद्य तेलाचे दर 15 ते 20 टक्क्यांनी कमी झाले आहेत असे त्यांनी सांगितले.
गेल्याच आठवड्यात खाद्यतेलाच्या भारतातील उत्पादकांनी खाद्य तेलाचे दर कमी केले असल्याचे निवेदन जारी केले होते. याकडे त्यांनी लक्ष वेधले. तेलबियांचे उत्पादन वाढावे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्न करीत असून त्यामुळे यावर्षी मोहरीचे उत्पादन 32 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता दिसून येत आहे असे ते म्हणाले.
त्यामुळे एकूणच तेलाचे दर कमी होण्यासाठी मदत होणार आहे. असे असले तरी सरकारचे परिस्थितीकडे बारीक लक्ष आहे असे त्यांनी सांगितले.