नगर(प्रतिनिधी) – जिल्ह्यातील करोना स्थितीबरोबरच खतांची टचांई, बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, दुधाला भाव मिळावा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. प्रा. गाडे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या मागण्या केल्या.
यावेळी प्रा. गाडे म्हणाले, जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून दररोज शंभर पेक्षा जास्त करोना रुग्ण वाढत आहेत. नागरिकांची करोना तपासणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पाच ते दहा दिवसांनी येतो. त्यामुळे संक्रमण वाढत आहे. तपासणी प्रक्रियेची गती वाढवून अहवाल लवकरात लवकर मिळावेत.तसेच जिल्ह्यात खतांसाठी शेतकऱ्यांच्या कृषी दुकानांसमोर रांगा लागल्या आहे. युरिया खताची मोठ्या प्रमाणात टचांई निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांना वेळेत खते मिळावीत. सोयबीन बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना तातडीने भरपाई देण्यात यावी. दुधाचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दुधाचे दर वाढविण्यात यावेत, अशी मागणीही प्रा. गाडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.