पुणे -पुरामुळे कोल्हापूर, सांगलीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळे लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू अधिक पैसे देऊन घ्याव्या लागत आहेत.
नागरिकांनी सांगितले की, या भागात दूध 100 रुपये प्रतिलिटर भावाने विकले जात आहे. सर्वसामान्य परिस्थितीत पाण्याची बाटली 20 रुपयाला येते. मात्र, सध्या निर्माण झालेल्या टंचाईमुळे आणि पाण्याच्या बाटलीसाठी 50 रुपये मोजावे लागत आहेत. टोमॅटोचे दर 50 रुपयावरून 400 रुपयांवर गेले आहेत. हीच परिस्थिती हिरव्या मिरच्यांची आहे. पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे त्याचा इतर सर्व सेवांवर परिणाम झाला आहे. बरेच एटीएम बंद झाल्यामुळे नागरिकांना रोकड मिळविणे अवघड झाले आहे, असे या भागात कार्यरत मुकुंद दीक्षित यांनी सांगितले. मात्र, बॅंकांचे अधिकारी या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसूत येत आहे.
या भागाकडे जाणारे नागरिक लगतच्या महामार्गावरील हॉटेलमध्ये थांबण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे याठिकाणी या नागरिकांना अधिक पैसे द्यावे लागत आहेत. त्याचबरोबर या भागाकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या मालवाहतूक दारांनी जोखीम जास्त असल्यामुळे आपले दर वाढविल्याचे काही ठिकाणी आढळून आले. त्यामुळे वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.