सातारा -जनावरांना अतिशय घातक अशा लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यास जनावरे दगावून मोठे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच दुधाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. वेळीच पशुसंवर्धन विभागाबरोबरच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी याचे गांभिर्य ओळखावे. जनावरांच्या लसीकरणासह विलगीकरण करुन उपचार करावेत. तसेच शेळया- मेढयांच्या बाबतीत आणखी नवीन कोणताही प्रादुर्भाव होऊ नये याकरीता सावधानता राखून प्रतिबंधात्मक उपाय योजावेत, अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.
राज्यातील जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून तातडीने सरकारने निर्णय घ्यावेत, अशी विनंती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडे केली आहे, असे भोसले यांनी सांगितले. प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, सातारा जिल्हयात पशुधन चांगल्या प्रमाणात आहे. दुध आणि दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती होत आहे. पुणे तसेच मुंबईला दुध पुरवठा सातारा जिल्हा करीत आहे. लम्पीचा फैलाव वाढल्यास पशुधन दगावून मोठी हानी होईल. दुध उत्पादक शेतकरी कोलमडुन जाईल. समाजाला दुधाच्या तुटवडयाचा सामना करावा लागेल. त्यामुळे या लम्पीचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा वाढू नये म्हणून पशुवैद्यकीय अधिकारी, पशुसंवर्धन विभाग यांनी समन्वयातून मोठया प्रमाणात जनावरांच्या लसीकरणाचे नियोजन करावे.
शिरवळ येथील व्हेटर्नरी कॉलेज,बोरगाव, रहिमतपूर, फलटण, कराड इत्यादी कृषी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहाय्याने पशुवैद्यकीय विभागाने तालुकानिहाय पशुधनाचे सर्वेक्षण करुन प्रत्येक जनावराचे लसीकरण करावे. लक्षण असलेल्या जनावरांचे शासनस्तरावर विलगीकरण करुन उपचार करावेत. जिल्हयातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे या मोहिमेची संपूर्ण जबाबदारी सोपवावी. जिल्हाधिकारी कार्यालयातून या मोहिमेचे नियंत्रण करावे. राज्याला मार्गदर्शक असे काम सातारा जिल्ह्यात करण्यात यावे, आदी सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना केल्याचे उदनराजे भोसले यांनी नमूद केले.