तोडणीस कारखान्यांची टाळाटाळ : शेतकरी दुहेरी कोंडीत
पुणे – राज्यात सध्या गळीत हंगाम सुरू झाला आहे, पण त्याला अजून वेग आलेला नाही. विशेष करुन पूरबाधित क्षेत्रात मोठी अडचण आहे. या भागातील ऊस तोडण्यास कारखान्याकडून टाळाटाळ होत असल्याने तब्बल 60 हजार हेक्टर क्षेत्रातील ऊस पीक कुजण्याच्या अवस्थेत आहे.
यंदाच्या अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली. यामध्ये प्रामुख्याने नदीकाठच्या ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी 15 ते 20 दिवस उसाचे पीक पाण्याखाली होते. यानंतर परतीच्या पावसानेही जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र धुमाकूळ घातला. विशेष करुन सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यातील ऊसपट्ट्याचे नुकसान झाले.
या चार जिल्ह्यांतील शेतकऱ्याचे 970 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या सर्व परिस्थितीमुळे यंदाचा हंगाम लांबला असून ऊसच उपलब्ध नसल्याने कारखान्यांनी फारशी उत्सुकता दाखवली नाही. आता काही कारखाने सुरू झाले आहेत, पण त्यांनी पूरबाधित क्षेत्रातील ऊस प्रथम तोडण्याऐवजी इतर भागातील उसाकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे साहजिकच नुकसानीमध्ये आणखी भर पडत आहे. विभागीय आयुक्तांनी कारखान्यांना आदेश दिले आहेत, की प्रथम बाधितक्षेत्रातील ऊस तोडावा म्हणजे जो काही शिल्लक आहे त्याचे गाळप होऊन शेतकऱ्याला थोडे फार पैसे मिळतील. पण कारखान्यांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पुरानंतर ही जो काही ऊस शिल्लक राहिला आहे, तो वाळून जाणार आहे. त्यामुळे 100 टक्के नुकसान होण्याची भीती आहे.
पुणे जिल्ह्यात सहकारी आणि खासगी असे एकूण जवळपास 18 साखर कारखाने आहेत. गेल्या वर्षीचा विचार केल्यास एक डिसेंबरपर्यंत पुणे जिल्ह्यातील सर्वच कारखाने सुरू झाले होते. यंदा या कालावधीत अजूनही निम्मेही साखर कारखाने सुरू झालेले नाहीत. गेल्या वर्षी उशिराने झालेल्या पावसामुळे आणि पाणीटंचाईमुळे जवळपास 35 हजार हेक्टरने उसाच्या लागवडीत घट झाली असल्याची स्थिती आहे. त्यापैकी यंदा गाळपासाठी सुमारे 1 लाख 37 हजार 904 हेक्टरवरील ऊस उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर मागील वर्षी कारखान्यांनी सुमारे 1 कोटी 20 लाख टन उसाचे गाळप केले होते.
जिल्ह्यात 82 लाख टन गाळपाची शक्यता –
जिल्ह्यात चालू वर्षी उसाच्या टंचाईमुळे सुमारे 82 लाख टन उसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 35 लाख 82 हजार टनाने गाळप कमी होण्याचा अंदाज आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात ऊस उभा दिसत असला, तरी पावसामुळे बहुतांशी पीक हातचे गेले आहे. त्यामुळे हंगामात उसाची परिस्थिती बिकट झाल्याने साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्याच जिल्ह्याच्या पश्चिम भागात झालेल्या जोरदार पावसामुळे व पाणीटंचाई व चाराटंचाईमुळे जवळपास 8 ते 10 हजार हेक्टर क्षेत्र कमी झाले आहे.