श्रीकांत कात्रे
सातारा – पुणे पदवीधर मतदारसंघाची यावेळची निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या प्रदेशाध्यक्षांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 65 उमेदवार असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड आणि भाजपचे संग्राम देशमुख यांच्यातच मुख्य लढत होत आहे. हे दोन्ही उमेदवार सांगली जिल्ह्यातील असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
भाजपच्या ताब्यात असलेला मतदारसंघ खेचून घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने अनेकदा प्रयत्न केले; परंतु भाजपचे, विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केडर या निवडणुकीतील मतदार नोंदणीत दरवेळी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने भाजपचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे. यावेळी सर्वांनीच नियोजनपूर्वक मतदार नोंदणी केली आहे. त्यामुळे हा बालेकिल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष राखणार की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ताबा मिळविणार, याची उत्सुकता सर्वच पातळ्यांवर आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपचा पारंपरिक हक्काचा. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना याच मतदारसंघातून ताकद मिळत गेली. या मतदारसंघाने दिलेल्या संधीमुळे जावडेकरांनी केंद्रीय पातळीपर्यंत मजल मारली. यापूर्वीच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील निवडून आले. गेल्या विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांतदादा विजयी झाल्याने यावेळी भाजपला नवीन उमेदवार द्यावा लागला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील पदवीधर या निवडीसाठी पसंतीक्रमानुसार मतदान करतात. या मतदारसंघातील जिल्ह्याची ठिकाणे वगळता ग्रामीण भाग मोठा आहे.
पुणे व सोलापूर जिल्ह्यात भाजपचे प्राबल्य आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस बलाढ्य आहे. पक्षीय ताकद कशीही असली तरी अखेर मतदारांची अधिक नोंदणी करण्यात बाजी मारणाराच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो, असा अनुभव आहे. राज्यातील राजकारणाचा विचार केला तर भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही लढत म्हणावयास हरकत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना यांनी किती जाणीवपूर्वक मतदार नोंदणी केली आहे.
यावरच जय-पराजयाचे गणित ठरणार आहे. भाजपचा पारंपरिक गड असल्याने दरवेळीप्रमाणे नियोजनबद्ध पद्धतीने सर्व केडरचा उपयोग करत नोंदणी झाली आहे. चंद्रकांतदादांचे निकटवर्तीय आणि सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचे या मतदारसंघातील मतदार नोंदणीचे गणित पक्के आहे. भाजपकडून त्यांच्याच उमेदवारीची अपेक्षा होती; परंतु सांगलीच्या पृथ्वीराज देशमुख यांचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असणारे संबंधच संग्राम देशमुख यांना उमेदवारी मिळवून देण्यात महत्त्वाचे ठरले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ही निवडणूक लढविण्यासाठी अरुण लाड अनेक वर्षांपासून इच्छुक होते; परंतु त्यांना कधीही उमेदवारी मिळाली नव्हती. खा. श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार होते. लाडही रिंगणात होते. त्यामुळे चंद्रकांतदादांचा विजय सुकर झाला. यापूर्वी राजेश पाटील-वाठारकर यांनीही राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रयत्न केला होता. यावेळी मात्र अरुण लाड यांना उमेदवारी मिळाली आहे. दोन्ही उमेदवार सांगली जिल्ह्यातील असल्याने एकमेकांची ताकद ओळखून आहेत. आजपर्यंतचे त्यांचे संबंध चांगले असले तरी आता ते एकमेकांविरोधात लढत आहेत. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जी. डी. लाड यांचे अरुण हे चिरंजीव तर सांगलीतील मातब्बरांच्या राजकारणात बदल घडवणारे संपतराव देशमुख यांचे संग्राम हे चिरंजीव. राजकीय वारसा असलेले दोन्ही उमेदवार आपली ताकद पणाला लावतील, यात शंका नाही.
मतदारसंघातील पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली व सोलापूर महापालिका भाजपच्या ताब्यात आहेत. पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. यावेळी सर्वच पक्षांनी जोरदार मतदारनोंदणी केली आहे. शहरी व ग्रामीण भागात झालेली नोंदणी निर्णायक ठरणार आहे. मतदारसंख्येत सर्वाधिक नोंदणी पुणे जिल्ह्यात झाल्याने उमेदवार सांगलीचे असले तरी पुण्यातील घडामोडी महत्त्वाच्या ठरतील. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर भाजपच्या केडरला आव्हान मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही प्रदेशाध्यक्ष आपापल्या उमेदवारासाठी व्यूहरचना आखण्यात तरबेज आहेत. पाचही जिल्ह्यांमधील सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी त्यांच्या पक्षांसाठी काम केले तर या लढतीतील चुरस अधिक रंगत जाणार आहे.
पदवीधरांचे प्रश्न दुर्लक्षितच
पुणे पदवीधर मतदारसंघातील लढत रंगतदार होईलच; परंतु पदवीधरांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात की नाही, याबाबत सारेच अनभिज्ञ असतात. पदवीधर असल्याने मतदार सुशिक्षित आहे. त्यामुळे तो पदवीधरांच्या प्रश्नांबरोबरच देश, राज्य, जिल्हा पातळीवरील विकासाचा विचार करत असणार, हे गृहीत धरावे लागणार आहे. पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत साऱ्यांच्या कामकाजाचा आढावा मतदारांसमोर असणार आहे. त्याशिवाय मतदारांमध्ये बेरोजगार युवक-युवतींचा समावेश आहे. शिक्षणासंबंधीचे प्रश्न आहेत.
विनाअनुदानित शाळांमध्ये काम करणाऱ्यांचा विषय आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचाही विचार होण्याची शक्यता आहे. इतर मतदारसंघांमधील निवडणुकांपेक्षा ही निवडणूक वेगळी असल्याने या प्रश्नांची उत्तरे निकालातच मिळण्याची शक्यता आहे. म्हणूनच जयंत पाटील व चंद्रकांत पाटील यांचे कसब पणाला लागणार आहे. सुशिक्षित मतदारांशी संपर्क साधून आपापली भूमिका त्यांना पटवून द्यावी लागणार आहे.