चेन्नई – ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील चौथ्या कसोटी सामन्यात ब्रिस्बेनमध्ये दुखापतीमुळे प्रमुख खेळाडूंच्या जागी नवोदित खेळाडूंना दिलेल्या संधीमुळे भारताने मालिका जिंकून इतिहास घडवला. आता मायदेशात इंग्लंडविरुद्ध होत असलेल्या कसोटी मालिकेतही याच खेळाडूंना अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान देण्यासाठी संघ व्यवस्थापनावर दबाव वाढला आहे.
महंमद शमी व रवींद्र जडेजा वगळता प्रमुख खेळाडू पूर्ण तंदुरुस्त ठरल्यामुळे त्यांना संघात स्थान मिळण्याची शक्यता वाढलेली असतानाच नवोदितांना डावलण्यावर निवड समिती तयार होणार नाही. अशा स्थितीत ब्रिस्बेन कसोटीत खेळलेल्या संघात केवळ एक किंवा दोन बदल होतील असेही सांगण्यात येत आहे.
येत्या शुक्रवापासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ दोन वेगवान व तीन फिरकी गोलंदाजांना संधी देण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत जसप्रीत बुमराहच्या जोडीला इशांत शर्माच्या जागी महंमद सिराजलाच संधी मिळण्याचे संकेत मिळाले आहेत.
तसेच फिरकी गोलंदाजीत रवीचंद्रन अश्विनसह वॉशिंग्टन सुंदरचे स्थानही निश्चित समजले जात आहे. तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादवच्या नावाची चर्चा आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण व कर्णधार विराट कोहलीच्या निर्णयाकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.