नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार हटवावे आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याचिकेवर आज सुनावनी झाली असून सरन्यायाधीश बोबडे यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
मुंबईत अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूची घटना घडली. त्यावरून संपूर्ण राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे योग्य नाही असे सरन्यायाधीश म्हणाले.
याचिकाकर्त्याने केवळ मुंबईमधील घटनांचा उल्लेख करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. त्यावर सरन्यायाधीश बोबडे यांनी याचिकाकर्त्याला चांगलेच फटकारले आहे. “महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे हे तुम्हाला माहित आहे का? केवळ मुंबईतील घटनांवरून सर्व महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन कसे लावता येईल, असा सवाल करत सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला फटकारले.
महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी विरोधी पक्षांकडून सातत्याने हालचाली करण्यात येत आहेत. हे सरकार तीन पायांची शर्यत असून जास्त काळ टीकणार नाही, असे वक्तव्य अनेकवेळा विरोधी पक्षातील नेत्यांनी केले आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून महाराष्ट्राला अनेक मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. या संकटाचा सामना करताना, सरकार अपयशी ठरत आहे, असे म्हणत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी होत आहे.
मात्र, आज सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नसल्याचे सांगत याचिका फेटाळली आहे.