नवी दिल्ली – राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी गांबियाच्या संसदेला काल संबोधित केले. भारत आणि आफ्रिका यांच्यासमोर विकासाची समान आव्हानं आहेत. उभय देशात व्यापार आणि गुंतवणूक संबंध वृद्धींगत होत आहे. 2017-18 मधे द्विपक्षीय व्यापार 62 अब्ज अमेरिकी डॉलर्स होता. भारत हा आफ्रिकेतला सर्वात मोठा पाचवा गुंतवणुकदार असल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.
गांबियासमवेत असलेली भागीदारी भारत वाढवत आहे. गांबियाच्या प्राधान्यानुसार क्षमता वृद्धी, पायाभूत प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी वित्तीय सहाय्य यासारख्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी भारत सहाय्य करत आहे. गांबियातल्या ग्रामीण विकास, कृषी, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा यासाठी भारताने सवलतीच्या दरात 78.5 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स कर्ज देऊ केले आहे. शिक्षण, कौशल्य विकासासाठी भारतात दरवर्षी गांबियाचे युवक दाखल होत असतात. गांबियात संस्था बांधणीसाठी भारत कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर राष्ट्रपतींनी भारतीय समुदायालाही संबोधित केले.