फिरोजपूर -पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था स्थिती अबाधित ठेवण्यात कॉंग्रेस सरकारला सपशेल अपयश आले आहे. त्यामुळे पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केली.
फिरोजपूरमधील सभेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमरिंदर प्रथमच एका व्यासपीठावर येणार होते. मात्र, सुरक्षाविषयक त्रुटीशी संबंधित घटनेमुळे सभेला उपस्थित न राहता मोदी दिल्लीला परतले.
त्यावरून सभेनंतर पत्रकारांशी बोलताना अमरिंदर यांनी पंजाबमधील कॉंग्रेस सरकारवर निशाणा साधला. सभेचे ठिकाण पाकिस्तान सीमेपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहे. पंतप्रधानांच्याच सुरक्षेची निश्चिती करता येत नसेल तर काय म्हणावे? पंजाबमध्ये मजबूत सरकारची गरज आहे.
सुरक्षाविषयक त्रुटी पाहता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना पदांवर राहण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणाले. पंजाबमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी अमरिंदर यांच्या पंजाब लोक कॉंग्रेसने भाजपशी युती केली आहे. मुख्यमंत्रिपद गमवावे लागल्याने नाराज झालेल्या अमरिंदर यांनी कॉंग्रेसचा हात सोडून नवा पक्ष स्थापन केला.