लातूर – उदगीर जि. लातूर येथे होणारे 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वेगळेपण अनेक अर्थाने दिसणार आहे. याचे उद्घाटन दि. 22 एप्रिल रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर, समारोपासाठी दि. 24 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पर्यावरण या विषयावर भर देण्यात आला आहे.
“महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेवर हे या साहित्य संमेलन होत आहे. यात बाल साहित्यिकांनाही वाव देण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात होणारे हे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असून, ते सर्वांच्या प्रयत्नाने यशस्वी करू,’ असा विश्वास या साहित्य संमेलनाचे स्वागतध्यक्ष आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार उपस्थित होते.
“भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी, उदगीर’ येथे हे साहित्य संमेलन रंगणार आहे. यातील कार्यक्रमांची रविवारी पत्रकार परिषदेत घोषणा झाली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, आयोजक आदी उपस्थित होते. संमेलनात ग्रंथ प्रदर्शन, चित्र-शिल्प-कला प्रदर्शनी, अभिजात मराठी दालन आदीचा समावेश आहे. तर ग्रंथदिंडी, परिसंवाद, मुलाखत, कविसंमेलन, लोककला सादरीकरण, गझलमंच आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदा 20 एप्रिलपासून संमेलनातील विविध कार्यक्रम होणार आहेत. प्रख्यात संगीतकार, गायक अजय-अतुल आणि अवधूत गुप्ते यांचे कार्यक्रमदेखील सादर होणार आहेत.
उद्घाटन : दि.22 एप्रिल : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संमेलनाध्यक्ष भारत सासणे, मावळते अध्यक्ष जयंत नारळीकर, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी लेखक दामोधर मावजो, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उद्योगमंत्री तथा मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई, पंडित हृदयनाथ मंगेशकर उपस्थित राहणार आहेत.
समारोप : दि. 24 एप्रिल : राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, खासदार सुधाकर शृंगारे आदी उपस्थित राहणार आहेत.