सव्वाशे वर्षे जुन्या कॉंग्रेस पक्षाचा पुढचा अध्यक्ष आता लोकशाही मार्गाने निवडला जाणे जवळपास निश्चित झाले आहे. ही लढत खर्गे आणि थरूर यांच्यात होणार.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, शशी थरूर आणि कृष्णानंद त्रिपाठी यांनी शेवटच्या दिवशी कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या मैदानात दंड थोपटले. त्रिपाठी यांचा अर्ज रद्द झाला आहे. आता लढत होणे आहे ती खर्गे आणि थरूर यांच्यात. मात्र, थरूर आपला अर्ज मागे घेतील, असं तज्ज्ञांचे मत आहे. असं झालं तर, खर्गे बिनविरोध कॉंग्रेसचे अध्यक्ष निवडले जातील आणि थरूर मैदानात टिकून राहिले तर मतदान होईल. सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे, तीन वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचं घोडं न्हाणार आहे. 2019 मधील लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून पूर्णवेळ अध्यक्षाची मागणी होत होती. परंतु, हे घोडं अडून होतं.
तसं बघितलं तर, मल्लिकार्जुन खर्गे यांनं नाव अचानक पुढं आलं असं अजिबात नाही. अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार, माजी मंत्री मुकुल वासनिक आणि कुमारी शैलजा यांच्या नावाची चर्चा सुरू होती. जी-23 गटातून शशी थरूर आणि मनीष तिवारी यांच्या नावाचीही चर्चा झाली. यामुळे खर्गे यांचं नाव अचानक पुढं आलं, असं नव्हे! परंतु, अशोक गेहलोत आणि कमलनाथ यांच्यापैकी कुणी तरी एकाने कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचं जू आपल्या खांद्यावर घ्यावं, अशी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची इच्छा होती. अध्यक्षपदी निष्ठावंत व्यक्ती बसावा असं गांधी कुटुंबाला वाटत असलं तरी निष्ठावंत असण्यासोबतच त्यांच्यात वेगळे गुणसुद्धा असायला पाहिजे, असंही वाटत होतं आणि यात गैर काहीच नाही.
सव्वाशे वर्षे जुना एक राष्ट्रीय पक्षाचा गाडा हाकायचा झाला, तर केवळ निष्ठावंत असून चालणार नाही तर त्यासाठी नेतृत्वक्षमता, सर्वांना घेऊन चालणारा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्षासाठी फंड गोळा करण्याची क्षमता असली पाहिजे. अशोक गेहलोत आणि कमलनाथ या सर्व निकषांवर फिट बसत होते. म्हणून, दोघांपैकी कुणी तरी एकाने अध्यक्षपद सांभाळावे, असं गांधी कुटुंबाला वाटत होतं. यातही पहिली पसंती कमलनाथ यांना होती. सोनिया गांधी यांनी कमलनाथ यांना दोन-तीन महिन्यांपूर्वीच बोलावून याबाबत विचारणा केली होती. मुळात, कमलनाथ यांना अशोक गेहलोत बंडखोरी प्रकरणानंतरही बोलावून विचारणा करण्यात आली होती. अर्थात, दोन वेळा त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, त्यांनी यास नकार दिला. आपल्याला मध्य प्रदेशातच राहायचं आहे, असं सांगून त्यांनी नकार दिला. याशिवाय, आपण अध्यक्ष झालो तर कॉंग्रेसचं कसं नुकसान होऊ शकतं आणि भारतीय जनता पक्ष आपल्या नावाचा वापर करून कॉंग्रेसला कशाप्रकारे नुकसान पोहोचवू शकते, याची विस्तृत माहिती त्यांनी सोनिया गांधी यांना दिली. उदाहरण द्यायचं झालं तर, 1984 मधील शीख दंगल याचं देता येईल. आपण अध्यक्ष झालो तर भाजप वारंवार शीख दंगलीचा प्रचार करेल आणि याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला बसेल, असे कमलनाथ यांनी सोनिया गांधी यांना सांगितले असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. खरं म्हणजे, कमलनाथ यांना अध्यक्ष व्हायचंच नव्हतं म्हणून अशाप्रकारची पार्श्वभूमी त्यांनी मांडली असावी!
कमलनाथ यांच्यानंतर एक नाव उरलं होते ते म्हणजे अर्थातच अशोक गेहलोत यांचं. गेहलोत यांनासुद्धा राजस्थान सोडायचं नव्हतं. म्हणूनच त्यांनी राहुल गांधी यांना राजी करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. मात्र, राहुल गांधी यांनी तटस्थ भूमिका घेतली आणि गेहलोत यांना नाईलाजापोटी हायकमांडचे म्हणणे ऐकावे लागले. ते अध्यक्ष व्हायला तयार झाले; परंतु राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी सचिन पायलट यांना बसविण्यास त्यांचा विरोध होता. हा निर्णय आपल्यावर सोडून द्यावा अशी भूमिका हायकमांडने घेतली आणि पुढं तेच झालं जे होणार होतं!
अशोक गेहलोत यांच्या बंडखोरीनंतर हायकमांडच्या डोळ्यापुढे तीच जुनी नावं तरंगू लागली. उमेदवार अर्ज दाखल करण्यास केवळ दोन दिवस उरले होते. तिकडे, शशी थरूर यांनी अर्ज खरेदी केला होता. यामुळे हायकमांडचं टेंशन वाढलं होतं. तडकाफडकी निष्ठावंत उमेदवार निवडण्याचं प्रेशर गांधी कुटुंबावर आलं होतं.
मल्लिकार्जुन खर्गे, मुकुल वासनिक, मीरा कुमार, कुमारी शैलजा यांच्यापैकी कुणाची निवड करायची? असा प्रश्न हायकमांडला अस्वस्थ करीत होता. ही सर्व मंडळी निष्ठावंत असली तरी उर्वरित गुणधर्मांचं काय? असा प्रश्न पडला होता. हे विचारचक्र सुरू असतानाच एक नाव पुढं आलं तर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचं. निष्ठावंत, नेतृत्वक्षमता, संघटनकौशल्य आणि फंड मॅनेजमेंट सर्व कामात माहीर असं व्यक्तिमत्त्व. लगेच त्यांना उमेदवारी अर्ज खरेदी करण्यास सांगण्यात आले. अशाप्रकारे सिंग अध्यक्षपदाच्या शर्यतीत आले.
दिग्विजय सिंग यांचं नाव मनात ठरविल्यानंतरही कॉंग्रेस हायकमांडला एक प्रश्न फार विचलित करीत होता किंवा त्या प्रश्नाने अस्वस्थ करून सोडलं होतं! 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करायचा आहे. कॉंग्रेस पक्ष दिग्विजय सिंग यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुकीला सामोरे जातील; परंतु लहरीपणात कधी काय बोलून जातील याचा नेम नाही? या आणि अशा कितीतरी विचारांच्या लाटा हायकमांडच्या मनात उठत होत्या. निवडणुकीच्या तोंडावर यांनी एखादं उलटसुलट विधान केलं तर न लढताच निवडणुकीत पराभवाचा आस्वाद घ्यावा लागेल. राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर अशी साडेतीन हजार किलोमीटरची पदयात्रा काढत आहेत. सिंग यांच्या विधानानं यावर विरजण सोडलं तर काय होईल? अशा कितीतरी प्रश्नांनी हायकमांडच्या थिंक टॅंकला परेशान करून सोडलं होतं. उमेदवार अर्ज दाखल करण्याला आता एकच दिवस उरला होता.
या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर एक नाव पुढं आलं, ते होतं मल्लिकार्जुन खर्गे यांचं. हे नाव ठरविताना चार-पाच नावांवर चर्चा झाली. सोनिया गांधी यांना खर्गे यांचं नाव संयुक्तिक वाटलं. वासनिक यांना संघटनेचा दीर्घ अनुभव आहे. शिवाय, गांधी कुटुंबाशी निष्ठावंत आहेत. परंतु, त्यांच्याविरुद्ध एक केस सुरू आहे. अशात, वासनिक यांना अध्यक्ष बनविले तर भारतीय जनता पक्ष त्या केसला ऑक्सिजन दिल्याशिवाय राहणार नाही आणि तो पक्षाला मोठा सेटबॅक होऊ शकतो, असे पक्षाला वाटले. या तुलनेत मल्लिकार्जुन खर्गे हे योग्य उमेदवार होऊ शकतात, असे हायकमांडला वाटले आणि सिंग यांच्याजागी खर्गे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले! 1947 नंतर म्हणजेच स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत 16 नेत्यांनी कॉंग्रेस पक्षाची कमान हाती घेतली आहे. यात गांधी घराण्याचे पाच अध्यक्ष झाले आहेत. सध्या, कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आहेत आणि त्या कॉंग्रेसच्या इतिहासात सर्वाधिक काळ काम करणाऱ्या महिला नेत्या आहेत. 2000 साली कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकही झाली होती. त्यावेळी सोनिया गांधींसमोर उत्तर प्रदेशचे बडे कॉंग्रेस नेते जितेंद्र प्रसाद उभे होते.
आता, खर्गे यांचं अध्यक्ष होणं जवळपास निश्चित होणं आहे. एक तर ते निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येतील किंवा बिनविरोध निवडले जातील. त्यांचा विजय निश्चित आहे. लोकसभेची निवडणूक त्यांच्या अध्यक्षतेखाली लढली जाईल. नरेंद्र मोदी यांचा सामना कसा करतील? हा एक रणनीतीचा भाग आहे. परंतु, खर्गे यांच्यामुळे कॉंग्रेस पक्षाची एक मोठी डोकेदुखी संपली असं म्हणायला हरकत नाही. जी-23 गटाचे सदस्य पूर्णपणे मवाळ झाले आहेत. जवळपास सर्वांनीच खर्गे यांच्या नावाला पसंती दिली आहे. एवढंच नव्हे तर, सर्वांनी प्रस्तावक म्हणून सह्यासुद्धा केल्या आहेत.