नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे परत घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे टिकरी बॉर्डरवरील आंदोलनाच्या जागेवर व्यवस्था चोख करायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे मनोधैर्य खच्चि करण्याचे खूप प्रयत्न केले. याशिवाय शेतकऱ्यांच्या मुलांना देखील तुरुंगात डांबण्यात आले. तरीदेखील शेतकरी कायदे रद्द करत नाहीत तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त करत आहेत. त्याची तयारी सुरु झाली असून देशातील अनेक ठिकाणी महापंचायत घेण्याची तयारी सुरू केली आहे.
महाराष्ट्रामध्ये देखील महापंचायत होणार असून शेतकरी नेते राकेश टीकैत उपस्थित राहणार आहे.
कृषी कायद्याविरोधात सुरू असलेली शेतकऱ्यांची लढाई अजून वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेला हिंसाचार आणि इतर अनेक आरोप-प्रत्यारोपानंतर आता शेतकरी सिंघू आणि टीकरी बॉर्डरवर सीसीटीव्ही, वायफाय आणि राहण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या वस्तु आणण्याच्या तयारीत आहेत. जोपर्यंत कायदे परत घेतले जाणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, अशी भूमीका यापूर्वीच संयुक्त शेतकरी मोर्चाने घेतली आहे.
केंद्र सरकारकडून दिल्लीच्या सीमेवर इंटरनेट बंद केल्यामुळे इंटरनेटच्या वापरासाठी आंदोलक “ऑप्टिकल फायबर’चा वापर करणार आहेत. याशिवाय, येणाऱ्या उन्हाळ्याच्या वातावरणात गर्मी होऊ नये, यासाठी इलेक्ट्रिक फॅन आणि एसी लावले जाणार आहे.
सिंघु बॉर्डरवरील सर्व व्यवस्था पाहणारे दीप खत्री यांनी सांगितले की, या ठिकाणी 100 सीसीटीव्ही कॅमरे लावले जात आहेत. याशिवाय, लक्ष ठेवण्यासाठी एक कंट्रोल रुम बनवली आहे. तसेच, रात्री पहारा देण्यासाठी आणि ट्रॅफिक सांभाळण्यासाठी 600 जणांची टीम बनवली आहे. 10 ठिकामी एलसीडी स्क्रीन लावली आहे.