खरेदी युनिट संपले की आपोआपच वीजपुरवठा बंद
प्रिपेड वीज मीटरचा शॉक प्रत्येक ग्राहकाला लवकरच बसणार
सातारा – वितरणच्या प्रिपेड मीटरचे भूत वर्षभरात कधीही घराघरात अवतरणार आहे. रिचार्ज मारून वीज युनिट खरेदी करायची आणि खरेदी युनिट संपले की आपोआपच वीजपुरवठा बंद, असा हा फंडा असणार आहे. ही मोफत मीटर जोडणी झाल्यावर प्रत्येक महिन्याला एकूण बिलात पाच टक्के सवलत, डिपॉझिट नाही असे आमिष दाखविण्यात आले आहे. ही टॅंपर प्रुफ मीटर असल्यामुळे वीज चोरीला आळा आणि वसुलीच्या झंझटीतून मुक्ती साध्य करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रिपेड वीज मीटरचा शॉक प्रत्येक ग्राहकाला लवकरच बसणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रिपेड मीटर ग्राहकांना देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
सातारा जिल्ह्यात मीटर आणि निधी उपलब्ध होताच, नवीन मीटर बसविण्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज झाली आहे. आज मूलभूत सोयीसुविधांमध्ये वीजपुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. लोडशेडिंगचा रोजच झटका, कमी दाबाने वीजपुरवठा सुरळीत करण्यास जमले नाही, वीज प्रवाहाने शेतीला आग लागून राख रांगोळी होऊनही संबंधितांना नुकसान भरपाई न देणाऱ्या महावितरण कंपनीने ग्राहकांना प्रिपेड मीटरचा शॉक देण्याच्या तयारीत आहे. यासाठी निधीची उपलब्धता आली की, राज्यात सर्व ग्राहकांना डिपॉझीट शिवाय मोफत ही मीटर देण्यात येणार आहेत. हे मीटर जोडल्यावर प्रत्येक ग्राहकाला वीज युनिट पैसे देऊन आधी खरेदी करावे लागणार आहेत. ती युनिट संपली की आपोआपच वीजपुरवठा खंडित होणार आहे.
सुट्टीच्या दिवशी युनिट संपले तर वीजपुरवठा खंडित होणार नाही. त्यावेळी सुखी तास या सुविधा अंतर्गत वीजपुरवठा सुरू राहील. दुसऱ्या दिवशी रिचार्ज मारल्यावर सुखी तासात वापरलेले युनिट वजा होऊन उर्वरित युनिट ग्राहकांना मिळणार आहेत. सातारा विभागात महावितरणचे एक लाख पंचाण्णव हजार घरगुती तर पस्तीस हजार व्यावसायिक ग्राहक आहेत. ही टॅंपर प्रुफ मीटर असल्याने वीज चोरी आणि गैर वापराला आळा बसणार आहे.
युनिट खरेदी करण्यासाठी ऑनलाइन रिचार्ज करता येणार आहे. त्याच बरोबर रिचार्ज स्टेशन सुध्दा असणार असून ग्राहकांना सहज युनिट खरेदी करण्याची व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. महावितरण वीज चोरी आणि वसुलीच्या झंझटीतून मुक्ती मिळविण्यासाठी प्रत्येक ग्राहकाला प्रिपेड मीटर बसवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामुळे लोडशेडिंग कमी होऊन अन्य समस्या कमी होतील, असा विश्वास काहींनी व्यक्त केला. मात्र, यावर ग्राहकांचा विश्वास बसत नाही.
ग्रामीण भागात लोडशेडिंग, शेती पंपाला ठराविक वेळीच वीजपुरवठा, अनेक ठिकाणी शॉक सर्किटमुळे शेतीची राख रांगोळी करणाऱ्या महावितरण कंपनीवर ग्राहकांचा चांगलाच रोश आहे. यात प्रिपेड मीटरच्या शॉकचा झटका सुध्दा ग्राहकांना असह्य होणार आहे. आधी वीजपुरवठा सुरळीत करा, मगचं प्रिपेड मीटर घरात लावा. असा विरोध होण्याची शक्यता अधिक आहे. प्रत्येक ग्राहकाला प्रिपेड मीटर बसविण्याचे लक्ष्य ठेवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. त्यामुळे राज्यात महावितरणकडून परिपूर्ण नियोजन केले असून ग्राहकांना सक्तीचा हा शॉक बसणार आहे. जिल्ह्यात लवकरच यासाठी निधी उपलब्ध होईल. त्यानंतर ग्राहकांना कधीही प्रीपेड मीटर हा शॉक बसणार आहे.