उत्तम पिंगळे
आजकाल राजकारणी इतके प्रॅक्टिकल झाले आहे की, निकालानंतर काय प्रतिक्रिया द्यावयाची, त्याची तयारी सुरू केलेली आहे. शेवटी सचिवाने त्या मोठ्या नेत्याने सांगितल्याप्रमाणे पत्र लिहून दिले. निवडणूक निकालानंतर काय प्रतिक्रिया द्यायची, त्यामध्ये पहिल्या प्रकारात जर सत्ताधाऱ्यांना हरवून कसेही जर गठबंधन आले तर काय बोलायचे. त्याचप्रमाणे सत्ताधारी पक्ष जेमतेम बहुमताकडे गेला किंवा अगदी स्पष्ट बहुमताकडे गेला तर काय बोलायचे ते देण्यास सांगितले होते.
सत्ताधाऱ्यांना हरवून जिंकल्यास…
माझ्या मायबाप मतदारांनो, आज खूप मोठा दिवस आहे. आज आपण आपली सद्सद्विवेकबुद्धी वापरून सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिलीत. तसेच आम्ही जे म्हणत होतो ते आपणास पटलेले आहे.सध्याच्या सरकारने सीबीआय, आरबीआय, निवडणूक आयोग संरक्षण अगदी न्यायालयातही हस्तक्षेप केला होता. सरकार स्वत:चे ध्येय पुढे करू पाहात होते. केवळ एकाच व्यक्तीची हिटलरशाही अस्तित्वात होती आणि ती आज आपण मोडून काढलेली आहे. विदेशी वगैरे काहीही मुद्दा नव्हता आणि आमच्या नेत्यांना उगाचच त्यांनी आरोपात गोवले आहे. आज आपण त्यांना सडेतोड उत्तर दिलेले आहे. आपण आता निश्चिंत राहा कारण देश एका घातक नेतृत्वाकडून सर्वमान्य नेतृत्वाकडे जाणार आहे.
बहुमत जेमतेम आल्यास…
आपण आम्हास नाममात्र बहुमत दिलेले आहे, हे आम्ही जाणतो. माझी विनंती गठबंधनातील सर्वांनाच आहे की सत्ताधाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. सर्वांनी एकत्र राहा. तसेच माझी कळकळीची विनंती सत्ताधाऱ्यांच्या घटक पक्षांना आहे की, त्यांनी आम्हास पाठिंबा द्यावा. मला वाटते की, ते आपली सद्सद्विवेकबुद्धी वापरून आमच्यात सामील होतील. जेणे करून या नवीन सरकारला बळकटी मिळेल.
पंतप्रधान कोण होणार या प्रश्नावर…
जे लोकसभेत निवडून गेले आहेत त्यांचे नेते एकत्रितपणे योग्य निर्णय घेऊन सामूहिक असे नेतृत्व मिळेल. महाआघाडीत लोकशाही आहे व आपल्या निर्णयाचा मान राखला जाईल. आमचा हा विजय आपलाच आहे.
सत्ताधारी आघाडी जेमतेम आल्यास…
आम्ही आपल्या मतांचा कौल मान्य करतो, पण आता सत्ताधाऱ्यांमध्ये नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी घटक पक्षांनी आमच्याकडे यावे, असे मी आवाहन करीत आहे. काही घटक आमच्या बाजूने निश्चित येतील. थोडी वाट पाहा.
सत्ताधारी पक्षास स्पष्ट बहुमत…
सर्वप्रथम आम्ही जनतेचे आभार मानतो.सत्ताधाऱ्यांचा हा विजय म्हणजे त्यांच्या मनी पॉवरचा तसेच इव्हीएम गडबडी करून मिळाला आहे. सर्व स्वायत्त संस्थांना हाताशी घेऊन गडबड केलेला विजय आहे. आम्ही आधीच नेतृत्वावर आरोप केलेले होते. देशात फूट पाडून हा विजय संपादित केला आहे. भविष्यात तुम्हाला याची चाहूल येईलच. आम्ही आयोगाकडे व्हीव्हीपॅटच्या सर्व पावत्या मोजण्याची मागणी केलेली आहे तसेच सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतलेली आहे. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत देशात राष्ट्रपती राजवट यावी तसेच नव्या सरकारचा शपथविधी केला जाऊ नये. आपल्या सर्वांचीही यामध्ये साथ असावी, असे आम्ही आपणास आवाहन करतो.