पाटण– पाटण तालुक्यात पर्यंटनाला मोठा वाव असून या पर्यटन विकासातून स्थानिकांना रोजगार निर्मिती होऊ शकते . सर्वांनी एकत्र बसून पाटण तालुक्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करावा, अधिवेशनानंतर या पर्यटन आराखड्याबाबत बैठक घेऊन येथील पर्यंटनाला शासन चालना देईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोयना धरणाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार अनिल बाबर, जलसंपदा विभागाचे सचिव संजय घाणेकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विलास रजपूत, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे आदी उपस्थित होते.
निसर्ग संपदेने नटलेला हा परिसर आहे त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटनाला वाव आहे पर्यटन वाढीमुळे रोजगाराचा प्रश्न मिटणार आहे अधिवेशनानंतर पाटण तालुक्याच्या पर्यटन विकासावर बैठक घेऊन या परिसराचे नंदनवन करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
प्रारंभी जलसंपदा सचिव घाणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे शक्तिपीठ कोयना प्रकल्प पुस्तिका व स्मृतीचिन्ह देऊन स्वागत केले. यानंतर त्यानी कोयना धरणाची संपूर्ण माहिती दिली. कोयना धरण पाहणीनंतर त्यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या.
‘प्रभात’ चा अंदाज खरा ठरला..!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोयना दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभातने याबाबतचा कोयना पर्यटनासाठी मुख्यमंत्री मोठी घोषणा करणार असल्याचे अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांनी पाटण तालुक्याच्या पर्यटनाचा आराखडा तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे भविष्यात पाटण तालुक्यातील पर्यटन बहरणार असल्याचे संकेतच मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले मुख्यमंत्र्यांचे स्वागत…!
राष्ट्रवादीचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून खास स्वागत करण्यासाठी सत्यजितसिंह पाटणकर कोयनेत दाखल झाले. त्यांच्याबरोबर पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार होते. तर मुख्यमंत्र्यांसोबत गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते. देसाई-पाटणकर हे जिल्ह्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.