पिंपरी – परतीच्या पावसाने विविध भागातील पिके नष्ट झाली आहेत. परिणामी बाजारपेठेमध्ये आता आवक चांगलीच घटल्यामुळे भाजीपाल्याचे दर चांगलेच कडाकडले आहेत. कांदा शंभरीच्या पार जात आहेत, तर कोथिंबीरची एक जुडी 80 च्या घरात गेली आहे. तर लसणाने द्विशतक ठोकल्यामुळे आमटी व वरणाच्या फोडणीचा गृहिणीला चांगलाच ठसका लागत आहे. बाजारातील भाजीपाल्याची आवक पुढील काही दिवस अशीच राहिल्यास सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करणे मुश्कील होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून अवकाळी आणि परतीच्या पावसाने चांगलाच हाहाकार उडवला आहे. या पावसाचा शेतीपिकाला मोठा फटका बसल्यामुळे उभ्या शेतातील काढणीला आलेले पीक वाया गेले आहे. पावसाच्या तडाख्यात फळभाज्या आणि पालेभाज्याही वाचू शकलेल्या नाहीत. सध्या पालेभाज्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र उत्पादनात परिणाम झाल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारातही पालेभाज्यांची आवक घटली आहे. परिणामी नियमित जेवणासाठी वापरल्या जाणाऱ्या पालेभाज्यांचे दर गगनाला भिडल्याचे दिसून येत आहे.
सध्या पिंपरी येथील भाजीमंडईमध्ये कोथिंबीरीच्या जुडी 80 रुपयांवर गेली आहे. तर कांद्यांने शंभरी गाठली आहे. लसूण 200 रुपये किलो प्रमाणे विकाला जात आहे. तर मिरचीचा दर 60 रुपये किलो झाला आहे. दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आमटी आणि फोडणीचा ठसका गृहिणीला लागला आहे. जेवणामध्ये नियमीतपणे कोथिंबीर, लसूण, मिरची, टोमॅटो व कांदा याची आवश्यक्ता असते. मात्र, दर गगणाला भिडल्यामुळे सध्या गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. पुढील काही दिवसात ही भाववाढ कायम राहिल्यास जेवणातून महत्वाच्या पालेभाज्या गायब होण्याची शक्यता दिसत आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली. त्यामुळे, सध्या मागणी तसा पुरवठा होत नाही. त्यामुळे, भाज्यांचे दर काडाडले असल्याचे एका भाजी विक्रेत्याने स्पष्ट केले आहे.
मोशी उपबाजार समितीत फळभाज्यांची आवक घटली, तर पालेभाज्यांची वाढली
मागील आठवड्यात मोशी येथील उपबाजारसमितीमध्ये 871 क्विंटल फळभाजी, पालेभाज्याच्या 7 हजार 720 गड्ड्यांची आवक झाली होती. तर या आठवड्यात फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. रविवारी फळभाज्याची केवळ 776 क्विंटल आवक झाली, तर पालेभाज्यांची 10 हजार 300 जुड्ड्या एवढीच आवक झाली आहे.