मुंबई: राज्यात लोकल आणि रेल्वेने दररोज हजारो महिला प्रवास करीत असतात. यातील गर्भवती महिलांना लोकल प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रत्येक कोचमध्ये दोन सीट आरक्षीत ठेवावेत, अशी मागणी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना निवेदन पाठविले आहे.
राज्यात कामावर जाण्यासाठी व दैनंदिन प्रवास करण्यासाठी महिलांना रेल्वेने दररोज प्रवास करावा लागतो. या प्रवासावेळी विशेषता गर्भवती महिलांना अनेक त्रास आणि गैरसोयींचा सामना करावा लागतो. विशेषता सकाळ आणि सायंकाळच्या वेळी त्यांची मोठी कुचंबना होते. लोकलमधून प्रवास करताना त्यांना गर्दीत मोठया संकटाचा सामना करावा लागतो. अशा महिलांना प्राधान्य देत प्रवासावेळी प्रत्येक कोचमध्ये किमान दोन सीट राखीव ठेवण्यात यावेत, अशी विनंती विजया रहाटकर यांनी आपल्या निवेदनात नमूद केली आहे.