नवी दिल्ली – लॉक डाऊन अंशत: कमी केल्यानंतर विविध क्षेत्रातील व्यवहार आणि वाहतूक वाढू लागली आहे. जून महिन्यामध्ये 4 कोटी 27 लाख इतकी ई- वे बिल निर्माण झाली. त्यामुळे व्यवहार सुरळीत होऊ लागल्याचे दिसून येते.
50हजार रुपयांच्या वरील वस्तूंची वाहतूक करण्यासाठी वाहतूकदारांना ई -वे बिल घ्यावे लागते. लॉक डाऊनअगोदर प्रत्येक महिन्याला जेवढी ई- वे बिल जनरेट होत होती, त्या तुलनेत जून महिन्यातील ई-वे बिलाचे प्रमाण 77 टक्क्यांवर पोहोचले आहे. मार्च महिन्यामध्ये केवळ 4 कोटी ई- वे बिल जनरेट झाली होती.
एप्रिल महिन्यात 84.53 लाख, मे महिन्यात 2.51 लाख ई -वे बिल जनरेट झाली होती. फेब्रुवारी महिन्यात 5.63 कोटी तर जानेवारी महिन्यात 5.61 कोटी ई- वे बिल जनरेट झाली होती. 25 मार्च रोजी देशभरात लॉक डाऊन सुरू करण्यात आले होते. त्यानंतर देशभरातील कंपन्या व नागरिकांच्या व्यवहारावर परिणाम झाला. त्याचबरोबर वाहतुकीवरही परिणाम झाला होता.
जीएसटी करप्रणालीचा माहिती तंत्रज्ञान विभाग जीएसटीएन नेटवर्क हाताळते. या संस्थेने म्हटले आहे की, ज्या प्रमाणात ई- वे बिल जनरेट होत आहेत, त्यानुसार रस्त्यावरील वाहतूक वेगाने पूर्वपदावर येऊ लागली आहे. जून मध्ये जीएसटी संकलन 90 हजार 917 कोटी रुपये झाले आहे. मे महिन्यांमध्ये हे संकलन 62 हजार कोटी तर एप्रिल महिन्यामध्ये केवळ 32 हजार 294 कोटी रुपये झाले होते. आता त्यात वेगाने वाढ होणार आहे.