प्रयागराज – येथे दलित कुटुंबातील चार जणांच्या हत्या करण्याच्या प्रकरणात अटक केलेल्या आठ जणांना सोमवारी सोडण्यात आले. तर पोलिसांनी तीन दलीत युवकांना अटक केली असून त्यातील एकाला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. दोन अरोपींना मात्र लवकरच सोडण्यात येईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
बलात्कार आणि हत्या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या दलीत युवकांच्या विरोधात पोलीस अधिकाऱ्यांना अद्याप कोणताही पुरावा मिळालेला नाही. गेल्या गुरूवारी एक दाम्पत्य आणि त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह सापडले होते. 11 जण त्यांच्या कुटुंबियांना धमक्यात देत होते. त्यांना पोलिसांची साथ मिळत असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला होता.
पोलिसांनी 11 जणांवर गुरूवारी गुन्हा नोंदवला, त्यानंतर उच्च जातीतील आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.या कुटुंबियांची प्रियंका गांधी यांनी भेट घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ सरकारवर टीकेची झोड उठली. त्यावेळी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. हे सरकार दलीत विरोधी असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येऊ लागली.
दलीत युवकांच्या कुटुंबियांनी सांगितले की, त्यांच्या मुलाला शनिवारी सायंकाळी पोलिसांनी उचलले. त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तो 19 वर्षांचा असून मोलमजुरीचे काम करतो. त्याला न्यायलयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. मृतांच्या घरापासून दोन किमी अंतरावर राहणाऱ्या दोघांनाही शनिवारी अटक करण्यात आली. त्यांना कधी सोडणार असे विचारण्यासाठी त्याच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती.
या दोघांविरोधात कोणताही पुरावा न सापडल्याने त्यांना लवकरच सोडण्यात येईल, एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटल्याचे इंडियन एक्सप्रेसच्या संकेतस्थळावरील वृत्तात म्हटले आहे.
प्रयागराज विभागाचे उपमहानिरीक्षक प्रेमप्रकाश यांनी एक निवेदन रविवारी प्रसिध्दीस दिले . त्यात त्यांनी म्हटले आहे की, या मुलीला सतावणारा 19 वर्षीय युवकाने बलात्कार करून त्या मुलीची हत्या केली. अखेरचा मेसेज आणि परिस्थितीजन्य पुराव्यांवरून त्याला अटक करण्यात आली आहे, असे त्या निवेदनात म्हटले आहे.
या तपास पथकात समाविष्ट असणाऱ्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आमच्याकडे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम दिले असल्याने आरोपीकडे चौकशी करण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ मिळाला नाही. आम्ही न्यायवैद्यक अहवाल आणि डीएनए अहवालाची वाट पहात आहोत. पुरावे हा तपासाचा भाग आहे. आम्हाला तरी आतापर्यंत तसे काही सापडले नाही.
सोमवारी प्रकाश अथवा पोलीस महानिरीक्षक सर्वश्रेष्ठ त्रिपाठी प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत. त्रिपाठी हे रजेवर आहेत. मरण पावलेल्या दलीत कुटुंबाच्या नातेवाईकांनी पोलीस उच्च जातीतलि आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. एक 19 वर्षांचा चौघअंना कसे मारू शकेल? आणि जर त्यात अन्य कोणाचा सहभाग असेल तर ते कोठे आहेत? जर त्या मुलाचे माझ्या पुतणीशी काही वाद असतील तर तो तिला मारेल अन्य तीन जणांना कशाला मारेल?
बलात्कार करून हत्या करण्यात आलेली मुलगी अल्पवयीन असल्याचे तिचे काका सांगतात तर पोलीस मात्र त्यांना ती 23 वर्षाची असल्याचे पुरावे असल्याचे सांगत आहेत.
ही घटना घडली त्या दिवशी माझा भाऊ घरातच होता. पोलिसांना उच्च जातीतील आरोपींना वाचवायचे असल्याने त्याला बळीचा बकरा बनवण्यात येत असल्याचे या 19 वर्षीय आरोपीच्या मोठ्या बहिणीने सांगितले.