रमजानचा पवित्र महिना 25 पासून सुरू होणार
नवी दिल्ली : रमजानच्या काळात उपवास बंधनकारक आहेच. पण नागरिकांनी लॉकडाऊन सुरू राहिल्यास मशिदीत प्रार्थनेसाठी न जाता घरातच प्रार्थना करावी, असा सल्ला ऐशबाग इदगाहचे प्रमुख मौलाना खालीद रशिद फिरंगी महली यांनी दिला आहे.
लॉकडाऊनच्या काळात रमजानचे पालन करण्याबाबत ऐशबाग इदगाहचे इमाम आणि इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाचे प्रमुख मौलाना खालीद रशीद फिरंगी महली यांनी रमजान सुरू होण्याआधी दहा दिवस मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य असणाऱ्या मौलानांनी 25 एप्रिलपासून रमजान सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
रमजानच्या काळात लॉकडाऊनची स्थिती कायम राहिल्यास नागरिकांनी रोजा करावा. सायंकाळी इफ्तार करावा. मात्र मस्जिदीमध्ये या काळात सामुहिक प्रार्थना होणार नाहीत. लोकांनी ती आपापल्या घरातच करावी. मशिदीत रहाणाऱ्यांनीच केवळ तेथे प्रार्थना करावी. मात्र त्यावेळीही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, असे मौलाना खलीद रशिद फिरंगी महल यांनी आपल्या व्हिडिओ मेसेजमध्ये म्हटले आहे.
या मौलानांनी या व्हिडिओद्वारे 12 सूचना केल्या आहेत. त्यात, या पवित्र महिन्यात उपवास हा बंधनकारक आहे. त्याच बरोबर प्रार्थना करताना ही साथ संपुष्टात येऊ दे म्हणूनही प्रार्थना करावी, असे त्यांनी सांगितले आहे. जे गरीब आणि गरजूंना मशिदीत इफ्तार देतात त्यांनी हा उपक्रम याही वर्षी राबवावा. मात्र तो केवळ खऱ्या गरजवंतांसाठी असावा. रमझानमध्ये इफ्तार पार्टी करण्यासाठी ठेवलेला पैसा त्यांनी दान करावा. मशिदीत कोणत्याही वेळेत पाच पेक्षा अधिक लोकांची उपस्थिती नको, असे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे.