मुंबई – राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानंतर सरकारच्यावतीने 10 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केल्याचे सांगितले. त्यातील 2 हजार कोटी रुपये दिवाळीच्या आधी देण्यात येतील, असे जाहीर केले. परंतु शेतकऱ्यांना ही मदत अजूनही मिळाली नाही, असा आरोप करत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारच्या महाविकासआघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.
ते पुढे म्हणतात, राज्य सरकार फक्त घोषणा करतं, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यांच्या करणी आणि कथनी मध्ये फरक असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम हे सरकार करत आहे, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
राज्यात अतिवृष्टीनंतर आम्ही दौरे आणि पाहणी केली. राज्य सरकारवर दबाब आणला. त्यानंतर सरकारच्यावतीने 10 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर झाली. त्यातील 2 हजार कोटी रुपये दिवाळीच्या आधी देण्यात येतील असे जाहीर झाले पण अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. 10 हजार कोटी रुपयांची मदत ही अपुरी मदत असून यामध्ये वाढ करून या मदतीचे तत्काळ वितरण करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारच्या महाविकासआघाडीकडे केली आहे.
तसेच कोकणात निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत राज्य सरकारने मदतीची घोषणा केली होती, परंतु तिथेही अद्याप मदत मिळाली नाही. त्यामुळे तिथे लोकांचा आक्रोश चालू आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.