-माधव विद्वांस
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांचा शपथविधी 25 जुलै, 2007 रोजी झाला होता. महाराष्ट्राला त्यांच्या रूपाने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याचा बहुमान मिळाला. ही तमाम महाराष्ट्रीयांच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे.
एका सामान्य घराण्यात जन्मलेल्या महिलेला हे पद मिळणे, त्यांच्या प्रदीर्घ राजकीय जीवनातील अनुभवाचे व स्वच्छ प्रतिमेचे उत्तम उदाहरण आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व मराठमोळ्या संस्कृतीचे प्रतीक आहे. कपाळावर ठसठशीत कुंकू आणि डोक्यावरचा पदर यामुळे त्या भारतीय पारंपरिक संस्कृतीची ओळख देतात.
त्यांचा जन्म उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे 19 डिसेंबर, 1934 रोजी झाला. त्यांचे वडील नारायणराव पाटील सरकारी वकील होते. त्यांचे शिक्षण जळगावच्या आर. आर. विद्यालयात व महाविद्यालयीन शिक्षण मुळजी जेठा महाविद्यालयात झाले. त्यानंतर पॉलिटिकल सायन्स अँड इकॉनॉमिक्समध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
मुंबई येथून कायद्याची पदवी घेतली. एमए करत असतानाच त्यांची पावले राजकारणाकडे पडली. त्याला कारण ठरले माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण. त्यांच्या एका कार्यक्रमात त्या उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी राजकारण स्वच्छ राहण्यासाठी महिलांची उपस्थिती गरजेची आहे, असे विचार आग्रहाने मांडले. त्यामुळे प्रभावित होऊन पाटील राजकारणात उतरल्या.
प्रारंभी काळात त्यांनी गरीब व निराधार महिलांसाठी महाराष्ट्रात वसतिगृहे काढली. राजकारणाव्यतिरिक्त त्यांनी विद्या भारती शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने अमरावती, जळगाव, पुणे आणि मुंबई येथे शाळा आणि महाविद्यालये स्थापन केली. तसेच श्रम साधना ट्रस्टची स्थापना केली असून त्यामार्फत नवी दिल्ली, मुंबई आणि पुण्यातील कामगारांसाठी वसतिगृहे चालविली जातात. वयाच्या 27 व्या वर्षी त्या प्रथमच जळगाव मतदारसंघातून वर्ष 1962 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेल्या. त्यानंतर वर्ष 1985 पर्यंत त्या सलग सहा वेळा निवडून आल्या.
आमदार झाल्यावर त्या मुंबई विद्यापीठातून कायद्याची परीक्षा पास झाल्या. 5 जुलै 1965 रोजी अमरावतीचे माजी महापौर देविसिंग शेखावत यांच्याबरोबर विवाह झाला. त्यांना एक मुलगा (रावसाहेब शेखावत, माजी आमदार) व एक मुलगी आहे. वर्ष 1967 मध्ये त्या पहिल्यांदाच मंत्री झाल्या. त्यांनी पुढे वीस वर्षे महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात आरोग्य, पर्यटन, गृहनिर्माण, संसदीय कामकाज, समाजकल्याण, शिक्षण, सांस्कृतिक, पुनर्वसन, शहरविकास, नागरी पुरवठा अशा विविध खात्यांचा कारभार कार्यक्षमतेने सांभाळला होता. वर्ष 1979 ते 80 या काळात विधानसभेत विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले. वर्ष 1985 ते वर्ष 1990 या कालावधीत त्यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली व त्या राज्यसभेच्या उपाध्यक्ष झाल्या.
राज्यसभेचा कालावधी संपल्यावर त्या वर्ष 1991 मध्ये लोकसभेवर अमरावती मतदारसंघातून निवडून आल्या. त्यानंतर वर्ष 2004 मध्ये राजस्थानच्या राज्यपालपदी त्यांची निवड झाली. भारत सरकारच्या प्रतिनिधी म्हणून त्या नैरोबीत आंतरराष्ट्रीय समाजकल्याण परिषद, प्रिटोरिया येथील महिला परिषद, म्युनिक येथील महिलांची जागतिक परिषद, तसेच दक्षिण अमेरिकेत बोलेव्हिया येथे झालेली परिषद, अशा सर्व ठिकाणी उपस्थित राहिल्या. 25 जुलै, 2007 रोजी पाटील भारताच्या राष्ट्रपती बनल्या.
राष्ट्रपती कार्यकाळात वयाच्या 74 व्या वर्षी सुखोई या लढाऊ विमानातून पायलटबरोबर उड्डाणही केले होते. अशा प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वाला दिर्घायुष्य लाभो…