मुंबई : शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली. प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचले होते. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांना ईडीनं ताब्यात घेतल्याचं समोर आलं होतं. यावरून आता आरोप प्रत्यारोपांना आणि राजकीय प्रतिक्रियांना सुरूवात झाली आहे.
“ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही”
भाजपा नेते नारायण राणे यांनीदेखील यावर एक प्रतिक्रिया देत अधिक बोलणे टाळले. “प्रताप सरनाईक हे काही साधू संत नाहीत,” असं म्हणत नारायण राणे यांनी त्यांच्यावर टीकेचा बाण सोडला.
“यावर मी काही सांगणार नाही. कायदेशीर गोष्टींवर आपण प्रतिक्रिया द्यायची नसते. न्यायालयानं दिलेले निर्णय, ईडी, सीबीआय यांची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय आपण प्रतिक्रिया द्यायची नसते.
प्रताप सरनाईक हे काही साधू संत नाहीत. माध्यमांनी आधी त्यांची माहिती घ्यावी, ईडीचा छापा योग्य अयोग्य हे सांगावं मग आम्ही प्रतिक्रिया देऊ,” असे नारायण राणे म्हणाले.
प्रताप सरनाईक यांच्या सुपुत्राला ईडीने घेतले ताब्यात
दरम्यान, “ईडीने जर धाड टाकली असेल तर त्यांच्याकडे काही तक्रार किंवा पुरावे असतील. त्याशिवाय ईडी धाड टाकत नाही. मी दौऱ्यात असल्याने मला याची सविस्तर माहिती नाही. पण ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. चूक झाली असेल कारवाई होईल,” अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर सुरुवात तुम्ही करा शेवट आम्ही करतो असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आव्हान दिले आहे.