Prashant Koratkar । छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी कोल्हापूरच्या कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, कोल्हापूर कोर्टाने प्रशांत कोरटकरचा जामिन अर्ज फेटाळला आहे. अंतरिम जामिनाचा अर्जच फेटाळण्यात आल्यामुळे त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हा निर्णय देताना कोर्टाने सरकारी वकील आणि फिर्यादीची विनंती मान्य केली. काल या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली होती. दरम्यान, कोर्टाने काल (दि. १८) आपला निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार कोर्टाने प्रशांत कोरटकरला जामिन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कोरटकरच्या अडचणी वाढल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
प्रशांत कोरटकरने काही दिवसांपूर्वी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन केला होता. हा फोन करून त्याने सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप करण्यात आला आहे. सोबतच यावेळी कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केल्याचाही आरोप आहे. याच प्रकरणात कोरटकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर कोरटकरने अंतरिम जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने मात्र हा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता कोरटकर याला कधीही अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रशांत कोरटकरची भाषा असभ्य : असीम सरोदे
वकील असीम सरोदे म्हणाले की प्रशांत कोरटकरची भाषा असभ्य, आक्षेपार्ह व क्रूर होती. त्याची भाषा छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारी व जातीय तेढ निर्माण करणारी होती. राज्य सरकारकडून कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला. तो अर्ज लगेच मान्य करुन न्यायालयाने त्याला जामीन दिला. हा निकाल देत असताना सरकारी पक्षाची आणि पोलिसांची बाजू जाणून घेतली नाही. इंद्रजित सावंत यांची काय बाजू आहे? हे ऐकून घेतेले नाही. एकतर्फी बेकायदेशीर पद्धतीने आदेश देण्यात आला होता, असे मत इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी व्यक्त केले.
मुंबई न्यायालयाने याची गंभीर दखल घेऊन कायद्याची बाजू लक्षात घेऊन याची कोल्हापूर न्यायालयामध्ये सुनावणी झाली पाहिजे. कोल्हापूरला याची दुपारी सुनावणी आहे. सुरक्षित जागा शोधण्यासाठी तो सगळीकडे फिरतो आहे यामध्ये महाराष्ट्र पोलिसांची बदनामी होत आहे. महाराजांबाबत काहीही बोललं तरी चालेल त्या माणसाला संरक्षण मिळत आहे असं चित्र राज्यामध्ये निर्माण व्हायला नको,” असे स्पष्ट मत असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे.
पोलिसांनी बिळात लपलेल्या कोरटकरला शोधून काढले पाहिजे : इंद्रजित सावंत
इंद्रजित सावंत म्हणाले, आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा त्याने अवमान केला होता. त्यामुळे मी व्यथित होऊन फिर्याद दिली होती. आता पोलिसांनी बिळात लपलेल्या कोरटकरला शोधून काढलं पाहिजे. त्याला कायद्यानुसार शिक्षा व्हायला पाहिजे आणि ती होईल अशी आशा आहे. कोरटकरला तत्काळ अटक झाली असती तर फोनमधील अनेक गोष्टी कळाल्या असत्या. तो जर फरारी नसेल, थोडी जरी लाज शरम वाटत असेल तर त्याने पोलिसांसमोर यायला हवं. हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने चालतं, त्यामुळे सरकार योग्य ती कारवाई करेल, असे इंद्रजित सावंत म्हणाले.